बांगलादेशला नमवून भारताची जेतेपदाची सप्तपदी

Rohit Sharma
Rohit Sharma

दुबई : चिवट प्रतिकार करणाऱ्या बांगलादेशला अखेर तीन विकेट राखून आणि शेवटच्या चेंडूवर चकवित भारताने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर सातव्यांदा नाव कोरले.

बांगलादेशच्या 223 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजांनी धैर्याने फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची खेळी भारताकडून सर्वोच्च ठरली. तर, दिनेश कार्तिकने (37 धावा) आणि महेंद्रसिंह धोनीने (36 धावा) यांच्या धावा भारताच्या विजयात मोलाच्या ठरल्या. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. केदार जाधवला झालेली दुखापत ही भारतासाठी डोकेदुखी ठरली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे भारताला विजय मिळविताना नाकीनऊ आले. अखेरच्या षटकांमध्ये जखमी केदार पुन्हा मैदानावर परतला आणि त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

त्यापूर्वी, बांगलादेशने 120 धावांची जबरदस्त सलामी मिळूनही बांगलादेशाचे सर्व फलंदाज 222 धावांमध्ये बाद झाले. दोन जीवदानांचा फायदा घेत सलामीवीर लिटन दासने झळकावलेल्या शानदार शतकामुळे बांगलादेशला अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी निर्माण झाली होती. भारतीय गोलंदाजांनी श्रम करून बांगलादेशाची धावसंख्या रोखली. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करायचा घेतलेला निर्णय बर्‍याच जाणकारांना चकित करून गेला. भारताने सलामीचे नेहमीचे फलंदाज सलामीचे नेहमीचे गोलंदाज आणि चहलला संघात परत जागा दिली. बांगलादेश संघ व्यवस्थापनाने लिटन दास सोबत शांत डोक्याने खेळणार्‍या मेहदी हसनला सलामीला पाठवून चांगली चाल रचली. खेळाच्या एकदम सुरुवातीला लिटन दासचा कठीण झेल दिनेश कार्तिकला पकडता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि बुमराची गोलंदाजी खूप परिणाम साधू शकली नाही. तसेच फिरकी गोलंदाजांनी प्रभावी मारा केला नाही. लिटन दासने 34 चेंडूत अर्धशतक ठोकले. मेहदी हसन हुशारीने फक्त एकेरी धाव काढून दासला खेळायची संधी देत राहिला. अखेर केदार जाधवने संघाला 120 धावांच्या सलामीनंतर पहिले यश मिळवून दिले. अगोदरच्या बर्‍याच सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या लिंटन दासने बरोबर अंतिम सामन्यात मोठी खेळी केली. 87 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह लिटन दासने शतक पूर्ण केले. केदार जाधवने मुश्फीकूरला बाद करून कमाल केली. समंजस फलंदाज मेहमदुल्ला हवेतून फटका मारताना कुलदीपला बाद झाला तिथेच बांगलादेशच्या धावसंख्येतली गती मंदावली. 20 ते 40 षटकात 62 धावा निघाल्या.  

शेवटच्या 10 षटकांचा खेळ चालू झाल्यावर लिटन दासने गियर बदलला. 121 धावांची चांगली खेळी करून दास कुलदीपला बाद झाला ते धोनीने केलेल्या चपळ स्टपिंगमुळे.  तळात सौम्य सरकारने 33  धावा केल्यावर बांगलादेशचा डाव 222 धावांवर आटोपला. कुलदीप यादवने 3 आणि केदार जाधवने 2 फलंदाजांना बाद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com