चौथ्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय; रोहितचे दीडशतक

चौथ्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय; रोहितचे दीडशतक

मुंबई : अगोदर रणरणत्या उन्हात काजवे चमकवले आणि रात्र होताच बत्ती गुल गेली...पुण्यातील पराभवाची भारताने मुंबईत सडेतोड भरपाई केली आणि वेस्ट इंडीजची 224 धांवानी दाणादाण उडवत चौथा सामना जिंकला.  मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवण्याच्या या विजयात रोहित (162), रायुडू (100) आणि गोलंदाजीत खलिल अहमदची चमक सर्वात भारी ठरली.

पुण्यातीलल पराभवामुळे शेपटीवर पाय पडलेल्या विराट कोहलीच्या टीम इंडियाने विंडीजला डंख मारला आणि बेहाल करून त्यांना पुरते निरुत्तर केले. प्रथम फलंदाजी करतान भारताने उभारलेली 377 धावसंख्या आणि विंडीज सर्वबाद 153 ही तफावत सामन्याची कहाणी कथन करणारी ठरली.

भारताने कितीही धावा केल्या तरी त्याचा पाठलाग करण्याची धमक दाखवणाऱ्या वेस्ट इंडीजचा आज मात्र निर्धाराने पेटलेल्या भारतासमोर मात्रा चालली नाही. 14 षटकांतच सहा फलंदाज 56 धावांत गमावले यात धोकादायक शाय होप आणि हेटमायर यांचा समावेश होता त्यामुळे लढा देण्याअगोदर विंडीजची शस्त्रे म्यॅन झाली होती त्यानंतर भारताच्या विजयाची औपचारिकताच शिल्लक होती.

भारतीयांचा निर्धार आज एवढा पक्का आणि अचुक होता की नेमबाजीतही यष्टीभेद होत होता. कुलदीप यादवने होपला धावचीत करुन विंडीजच्या होप्स कमजोर केल्या त्यानंतर कोहलीने पॉवेलला धावचीत केले तीनपैकी दोन फलंदाज अशा प्रकारे बाद झाल्याचा परिणा त्यांच्या डावावर झाला. खलिल अहमदने तर हेटमेरची बहुमोल विकेट मिळवून खेळ खल्लास करून टाकला...हा होता रात्रीचा खेळ

हीटमॅनची टोलेबाजी  
परंतु, भर दुपारी कडकडीत उन्हात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजासमोर काजवे चमकवले ते हीटमॅन रोहीत शर्मा आणि रायडू यांनी. पुण्यातील सामन्यात मधल्या फळीतील अपयश भारताला भोवले होते त्याची भरपाई करण्यासाठी आजच्या सामन्यात केदार जाधव आणि रवींद्र दडेजा यांना संधी देण्यात आली, परंतु हे दोघे मैदानात येईपर्यंत रोहित आणि रायूडू यांनी विंडीज गोलंदाजांना शरण आणले या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 176  चेंडूत 211 धावांची भागीदारी केली.

रोहित आणि रायुडू यांनी आज सुरुवातीला डाव सावरला आणि त्यावर नंतर केवळ कळसच चढवला नाही तर सलग तीन शतके करणाऱ्या विराट कोहलीवरचा भारही हलका केला. 17 व्या षटकांत विराट परतला तेव्हा भारताचे शतक फलकावर लागले होते, खर तर त्यावेळी शंकेची पाल चुकचुकली होती, परंतु घरच्या मैदानावर मोर्चा सांभाळायची जबाबदारी रोहितने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि रायडूने त्याला तेवढीच मोलाची साथ दिली. 

या दोघांच्या फलंदाजीत कोणताच आततायीपण नव्हता सर्व चौकार जमिनीलगत होते आणि षटकार थेट प्रेक्षकांमध्ये पडत होते. सुरुवातीच्या खेळावर भारत साडेतिनशेची धावसंख्या गाठणार असे वाटत नव्हते.

शंभर चेंडूत शंभर अशा सरासरीने आपले 21 वे शतक पूर्ण करणाऱ्या रोहितची बॅट त्यानंतर एवढी आक्रमक झाली की द्विशतकाचे वेध लागले होते. अखेरची दहा षटके असताना तो 128 धावांवर होता, चांगली संधी होती, परंतु दीडशतकानंतर तो बाद झाला. यामध्ये मारतेले काही चौकार आणि षटकार त एका पायावर रेलून लेग साईडला नजाकतपणे मारलेले होते काही वेळ तर त्याने केवळ शरीराचा लेग साईडला झुकलेले असायचे.

संक्षिप्त धावफलक :
भारत : 50 षटकांत 5 बाद 377
( रोहित शर्मा 162 -137 चेंडू, 20 चौकार, 4 षटकार, शिखर धवन 38 -40 चेंडू, 4 चौकार 2 षटकार, विराट कोहली 16 -17 चेंडू, 2 चौकार, अंबाती रायुडू 100 -81 चेंडू, 8 चौकार, 4 षटकार, महेंद्रसिंग धोनी 23 -15 चेंडू, 2 चौकार, केदार जाधव नाबाद 16 -7 चेंडू, 3 चौकार, केमार रोच 10-0-74-2, नर्स 8-0-57-1, पॉल 10-0-88-1) वि. वि. वेस्ट इंडीज 36.2 षटकांत सर्वबाद 153 (चंदरपॉल हेमराज 14, शाय होप 0, सॅम्युल्स 18, हेटमेर 13,  जेसन होल्डर नाबाद 54,  खलिल अहमद 5-0-13-3, रवींद्र जडेजा 10-1-39-1, कुलदीप यादव 8.2-0-42-3)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com