केप टाऊन - भारतीय वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव आज (सोमवार) अवघ्या 130 धावांत आटोपला. हा सामना जिंकण्यासाठी भारतास आता 208 धावांची आवश्यकता आहे.
आज भुवनेश्वर कुमार (33 धावा - 2 बळी), जसप्रीत बुमराह (39 धावा - 3 बळी), मोहम्मद शमी (28 धावा - 3 बळी) आणि हार्दिक पांड्या (27 धावा - 2 बळी) अशा सर्वच जलदगती गोलंदाजांनी अचूक मारा केल्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरश: नांग्या टाकल्या. ए बी डिव्हिलयर्स याच्या 35 धावा, ही दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
एडन मर्क्रम (34 धावा - 65 चेंडू) आणि डीन एल्गर (25 धावा - 72 चेंडू) यांनी दक्षिण आफ्रिकेस अर्धशतकी सलामी दिली होती. मात्र ही जोडी फुटल्यानंतर डिव्हिलयर्स व केशव महाराज (15 धावा - 27 चेंडू) यांचा अपवाद वगळता अन्य कुठलाही फलंदाज दोन आकडी धावसंख्याही गाठू शकला नाही. आज झालेल्या खेळामध्ये दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 65 धावांत 8 फलंदाज गमावले.
या सामन्याचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला होता. मात्र सामन्यात अजूनही पुरेसा वेळ उपलब्ध असल्याने भारतास हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी असल्याचे मानले जात आहे.
|