
IND vs AUS : स्टार्कचा पंजा! ओपनिंग जोडीनं 'स्टार्टर'मध्येच संपवली मॅच
India vs Australia 2nd ODI : मुंबईत कसा तरी टीम इंडियाचा जीव वाचला, पण दोनच दिवसांत विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा खेळ खल्लास केला. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओपनिंग जोडीनं 'स्टार्टर'मध्येच मॅच संपवली. अवघ्या 55 मिनिटे आणि 66 चेंडूंमध्ये 10 गडी राखून पराभव केला.
अशा प्रकारे 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी झाली आहे. प्रथम, मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना रडवले. या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने 26 षटकात केवळ 117 धावा केल्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कने पाच बळी घेतल्या.
मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह कांगारू संघाने मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत होणार आहे. तिसरा एकदिवसीय सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. मिचेल मार्शने 36 चेंडूत 66 आणि ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 51 धावा केल्या. मार्शने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. हेडने 10 चौकार मारले.
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर भारताचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला. ना रोहित शर्मा चालला ना हार्दिक पांड्या. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. परिस्थिती अशी होती की 11 पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले.
विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्याचवेळी अक्षर पटेलने नाबाद 29 धावा करत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. रवींद्र जडेजाने 16 आणि रोहित शर्माने 13 धावा केल्या. केएल राहुल नऊ आणि हार्दिक पांड्या केवळ एक धाव करू शकले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पाच आणि शॉन अॅबॉटने तीन बळी घेतले. नॅथन एलिसला दोन यश मिळाले.