वर्ल्ड कप 2019 : फलंदाजी असो वा गोलंदाजी किंवा संघ नियोजन या आघाड्यांवर दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत लवचिकता दाखवता आलेली नाही. विश्वकरंडकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळताना दक्षिण आफ्रिकेला याचा विचार करावा लागणार आहे. पहिले दोन सामने हरल्यावर किमान भारताविरुद्ध त्यांना आपण असा विचार करायला सुरवात केल्याचे दाखवून द्यावे लागेल. परिस्थितीनुसार मैदानावर कर्णधार फाफने बदल करायला हवेत. इंग्लिश हवामान उष्ण असेल, तर खेळपट्टी फलंदाजीस पोषक राहणार, हवामान अनुकूल असेल, तर वेगवान गोलंदाजीस साथ मिळणार हे जाणून घेऊन निर्णय घ्यायला हवेत.
फलंदाजी आणि गोलंदाजी याचा समतोल दक्षिण आफ्रिका संघात दिसून येत नाही. या आगाडीवर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत हे संघ सर्वाधिक समतोल दिसून येतात. विशेष म्हणजे इंग्लंडला येऊन श्रीलंका संघ देखील एक वेळ स्थिरावलेला दिसून येतो. दक्षिण आफ्रिका संघात असे काहीच दिसून आलेले नाही. आव्हान राखायचे असेल, तर आता आगामी सात सामन्यांपैकू सहा सामने तरी दक्षिण आफ्रिकेला जिंकावे लागणार आहेत. यातही पाच सामने जिंकताना त्यांना धावगतीचाही विचार करावा लागणार आहे. हे सर्व कठिण आहे. सध्या तरी हे कठिण दिसून येत आहे. कारण त्यांचा सामना आता अशा भारतीय संघाबरोबर आहे की या संघाचा 12वा खेळाडू देखील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असतो.
यंदाच्या स्पर्धेत भारत अजून एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे ते विजयी सुरवात करण्यास उत्सुक असतील यात शंका नाही. त्याचवेळी दोन सामने खेळल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेला पहिल्या विजयाची प्रतिक्षा असेल. त्यामुळे हा सामना नश्चितच रंगतदार होणार यात शंका नाही. भारताकडे संभाव्य विजेते म्हणून बघितले जात आहे. त्याचवेळी त्यांचा कर्णधार विराट कोहली देखील मध्यावर्ती आकर्षण ठरत आहे. भारतीय संघ या वेळी चौथ्या क्रमांकापाशी अडला आहे. विजय शंकर आणि लोकेश राहुल हे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. यात राहुलचे पारडे जड वाटते. शंकर गोलंदाजी करू शकतो ही त्याची जमेची बाजू. पण, अजून विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याइतके त्याचे कौशल्य घोटवलेले नाही. जास्तीचा गोलंदाज खेळवण्याचा विचार झाल्यास कर्णधाराची पसंती शंकरला मिळेल. मला विचाराल तर भारताने राहुलच्या पर्यायाचा विचार करावा. तोच प्रश्न सहाव्या क्रमांकासाठी असेल. तो सोडवताना हार्दिक पंड्या आणि केदार जाधव यांच्यात टॉस होईल. रोहित, शिखर, विराट, धोनी, हार्दिक, शमी, बुमरा, भुवनेश्वर आणि कुलदीप असा भारतीय संघ असू शकेल. दक्षिण आफ्रिका संघाला फिरकी खेळण्यात अडचण येते हे लक्षात घेतल्यास भारतीय संघ एक वेगवान गोलंदाज कमी करून रवींद्र जडेजाचा विचार करू शकेल.
दक्षिण आफ्रिकेने देखील दुसरा फिरकी गोलंदाज म्हणू शम्सीचा विचार करायला हरकत नाही. सामना होणाऱ्या रोझ बाऊलचे हवामानच तसे संकेत देते. बुमरा आणि शमीला कव्हर करण्याची क्षमता पंड्याकडे असल्याने भारत कुलदीप, युझवेंद्र या दोन मनगटी फिरकी गोलंदाजांचा विचार करू शकते.
दक्षिण आफ्रिका संघ दुखापतींनी त्रस्त आहे. स्टेन पाठोपाठ एन्गिडी जखमी झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान मारा बोथट ठरत आहे. त्यामुळे आता फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला आपला सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ निवडावा लागेल. अमला, डू प्लेसी वगळता संघातील अन्य खेळाडू विश्वकरंडक स्पर्धेच्या अनुभवाला नवखे आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचेच पारडे जड राहणार यात शंका नाही. रोहित-शिखर यांच्याकडून चांगली सुरवात मिळाल्यावर कोहली, फॉर्ममध्ये असलेला धोनी यांना रोखणे दक्षिण आफ्रिकेला नक्कीच कठिण असेल.
दक्षिण आफ्रिकेला एबी डिव्हिलर्सची उणीव जाणवत आहे. त्याची जागा दुसरा कुणी घेऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले. युवा खेळाडूंवर विश्वास दाखवावाच लागेल. पण, त्यासाठी थोडा संयम हवा. द्विपक्षीय मालिकेत त्यांची कामगिरी चांगली झाली. पण, विश्वकरंडकात त्याचा प्रत्यय आला नाही. भारतच जिंकेल असा विश्वास आहे. ऑल दि बेस्ट !
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.