गयाना : मधेच खेळ, मधेच पाऊस हे खेळाडूंसाठी चांगले नसते. या परिस्थितीत खेळाडू जखमी होण्याचा धोका असतो, असे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. पावसाच्या सातत्याने येत असलेल्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची लढत रद्द झाल्यावर कोहलीने ही टिप्पणी केली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय लढतीत किमान चार वेळा पावसाचा व्यत्यय आला आणि अखेर अवघ्या 13 षटकांचाच खेळ झाल्यावर लढत रद्द करण्यात आली. पावसामुळे मैदान सोडणे आणि मैदानात परतणे याचा त्रास होतो, असे कोहली म्हणाला.
पावसाचा सततचा व्यत्यय क्रिकेटमधील सर्वात वाईट गोष्ट आहे. एकतर पावसाने पूर्ण लढत रद्द व्हावी किंवा पूर्ण खेळ नीट व्हावा. जेवढे ब्रेक जास्त येतात, तेवढी जास्त काळजी घ्यावी लागते. त्यावेळी जखमी होण्याचा धोका जास्त असतो, असे कोहलीने सांगितले. याचबरोबर वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांनाही लक्ष्य केले.
येथील काही खेळपट्ट्यांवरून चेंडू चांगल्या वेगाने येतो, तसेच उसळतोही; तर काही खेळपट्ट्यांवरून चेंडूचा वेग कमी होतो. त्यावर खेळणे अवघड असते. त्या खेळपट्ट्यांशी जुळवून घेणे सोपे नसते. त्यामुळेच प्रथम गोलंदाजीस पसंती दिली असे कोहलीने सांगितले.
अर्थात खेळपट्टीचे रंग पावसाने बघूच दिले नाहीत. लढत नव्वद मिनिटे उशिरा सुरू झाली. लढत सुरू झाल्यावर 5.4 षटकांतच खेळ थांबला. त्यावेळी विंडिजच्या दोन आकडी धावाही झाल्या नव्हत्या. एका तासाने खेळ सुरू झाला आणि त्यावेळी 40 षटकांची लढत ठरली. खेळाडू मैदानात आले, पण त्यावेळी मैदान खेळण्यासाठी पुरेसे योग्य नसल्याचे लक्षात आले. परिणामी खेळाडू परत पॅव्हेलियनमध्ये गेले. लढत सुरू झाली त्यावेळी प्रत्येकी 34 षटकांची लढत ठरली.
एल्विन लुईसने भुवनेश्वरला षटकार खेचत भारतीयांना इशारा दिला, पण त्यावेळी ख्रिस गेल प्रत्येक धावेसाठी झगडत होता. कुलदीप यादवने त्याला बाद केले. एल्विनचा हल्ला सुरूच होता, अखेर 13 व्या षटकात विंडीजने 1 बाद 54 अशी मजल मारलेली असताना पाऊस सुरू झाला आणि त्यात सामना वाहून गेला.
|