एप्रिल महिन्यातला दुसरा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अविस्मरणीय असा आहे. 2 एप्रिल कोण विसरू शकेल? 11 वर्षांपूर्वी याच दिवशी टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने 28 वर्षांचा दुष्काळ संपवत दुसऱ्यांदा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाने 1983 मध्ये पहिल्यांदा जेतेपद पटकावले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तगड्या वेस्ट इंडीजची हॅटट्रिक रोखून ही स्पर्धा जिंकली होती. याआधी दोन वेळा (1975 आणि 1979) वेस्ट इंडिजने विजेतेपद पटकावले होते. टीम इंडियाने 2011 मध्ये 1983 नंतर दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले. आता भारतीय संघ तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आहे.
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार धोनी, अष्टपैलू युवराज सिंग आणि सलामीवीर गौतम गंभीर यांनी चमकदार कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 गडी बाद 274 धावा केल्या होत्या. त्यानंतर महेला जयवर्धनेने 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 4 गडी गमावत 277 धावा केल्या आणि सामना आणि विजेतेपदावर नाव कोरले.
टीम इंडियासाठी फायनलमध्ये गौतम गंभीरने सर्वाधिक 97 धावांची खेळी खेळली. त्याचे या सामन्यात शतक थोडक्यात हुकले. त्यानंतर कर्णधार धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली. धोनीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवला होता. हा षटकार वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या चेंडूवर लागला होता. धोनीने गंभीरसोबत 109 धावांची शतकी भागीदारी केली होती. शेवटी युवराज सिंगसोबत नाबाद 54 धावांची भागीदारी केली. युवीने नाबाद 21 धावा केल्या होत्या.
संपूर्ण विश्वचषकात युवराज सिंग, सचिन तेंडुलकर आणि झहीर खानही धगधगत होते. 2011 च्या विश्वचषकात युवराजला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. युवराजने आपल्या बॉल आणि बॅटने संपूर्ण टूर्नामेंट थिरकवली होती. युवीने विश्वचषकात ३६२ धावा केल्या आणि 15 महत्त्वपूर्ण विकेट् घेतल्या होत्या. सचिनने टीम इंडियासाठी सर्वाधिक 482 धावा केल्या. तर झहीर खानने सर्वाधिक २१ बळी घेतले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.