मुंबई : सलामीवीर पृथ्वी शॉने आक्रमक अर्धशतक करीत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याबद्दलची बंदी संपल्यानंतर प्रथमच तो मैदानात उतरला आणि मुश्ताक अली ट्वेंटी- 20 स्पर्धेत आसामविरुद्ध वेगवान अर्धशतक केले.
वीसवर्षीय पृथ्वीने 38 चेंडूंत 63 धावा करीत मुंबई डावास जोरदार सुरुवात केली. पृथ्वीसह पहिल्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केलेल्या आदित्य तरेने पृथ्वीपेक्षा जास्त आक्रमक आणि उपयुक्त फलंदाजी केली. पृथ्वी तीन षटकार आणि सहा चौकार फटकावत असताना तरेने 13 चौकार लगावले. सिद्धेश लाडच्या अतिवेगवान पाऊणशतकाने मुंबईने द्विशतक पार केले.
क्रिकेटरसिकांच्या दृष्टीने या लढतीत पृथ्वीच महत्त्वाचा होता. त्याने अर्धशतक झाल्यावर बॅट कॅमेरामनच्या दिशेने उंचावली. जणू माझी बॅटच भविष्यात बोलणार आहे, असे तो सांगत होता. विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेसाठी आपणही एक दावेदार आहोत, हेच जणू पृथ्वीला सांगायचे होते. गतवर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना पृथ्वीने शतक केले होते, पण त्यानंतर त्याला दुखापतीने सतावले. आयपीएलद्वारे तो बहरात आला, पण त्यानंतर तो उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने संघाबाहेर गेला.
दरम्यान, मुंबईला स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यास फार कष्ट पडले नाहीत. धवल कुलकर्णी, शिवम दुबे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत आसामला सव्वाशेचीही मजल मारू दिली नाही.
संक्षिप्त धावफलक
मुंबई ः 5 बाद 206 (पृथ्वी शॉ 67 - 38 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकार, आदित्य तरे 79 - 49 चेंडूंत 13 चौकार, सूर्यकुमार यादव 0, श्रेयस अय्यर 15, सिद्धेश लाड नाबाद 32 - 15 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकार, सुजीत नायक नाबाद 10 - 4 चेंडूंत 2 चौकार, रियान पराग 4-0-29-3) वि. वि. आसाम ः 8 बाद 123 (सिबासंकर रॉय 22, रियान पराग 38, अमित सिन्हा 22. धवल कुलकर्णी 4-0-28-2, शिवम दुबे 3-1-3-2, शम्स मुलानी 4-0-15-2).
|