तटस्थ मैदानावर रणजी लढती खेळविण्याचा फज्जा

तटस्थ मैदानावर रणजी लढती खेळविण्याचा फज्जा

नवी दिल्ली - घरच्या मैदानावर खेळताना स्वतःला फायदेशीर अशी खेळपट्टी तयार केली जाऊ नये म्हणून यंदा सर्व रणजी सामने तटस्थ ठिकाणी खेळवले; परंतु बीसीसीआयच्या या प्रयोगावर काही खेळाडूंनी टीका केली आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे याचा फज्जा उडाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

घरच्या मैदानावर सामने खेळताता काही संघ स्वतःच्या क्षमतेनुसार खेळपट्ट्या तयार करत असल्याचे दिसून आल्यामुळे यंदा बीसीसीआयने सामन्यांच्या ठिकाणांमध्ये बदल केले आणि दोन्ही संघांपेक्षा वेगळ्या अशा तटस्थ ठिकाणी सामन्यांचे आयोजन केले; त्यामुळे यंदा कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली नाही.

ही संकल्पना चांगली होती; परंतु त्याची अंमलबजावणी सुमार होती. दुसऱ्या संघांच्या सामन्याच्या आयोजनासाठी यजमान संघटना उत्सुक नसायच्या. त्याचा सुविधांवर परिणाम व्हायचा. पुरेसे चेंडूही उपलब्ध नसायचे. खेळपट्ट्याही चांगल्या दर्जाच्या नसायच्या. अशा परिस्थितीत चांगली सुधारणा करता येऊ शकली असती, असे रणजी क्रिकेटमधील अनुभवी रजत भाटियाने सांगितले, भाटिया हा मूळचा दिल्लीचा असला, तरी तो या वेळी राजस्थानमधून खेळत आहे.

कौटुंबिक कारणामुळे यंदाच्या मोसमात केवळ चारच सामने खेळलेल्या भाटियाने या संकल्पनेवर टीका केली. घरच्या संघाला अनुकूल परिस्थिती तयार केली जात असल्यामुळे यापूर्वी काही सामने दोन दिवसांतच संपायचे; परंतु तटस्थ ठिकाणांची निवड करूनही यंदा परिस्थितीत सुधारणा झाली नाही, असे सांगताना भाटियाने विशाखापट्टण येथे झालेल्या राजस्थान वि. आसाम सामन्याचे उदाहरण दिले. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्यामुळे आमच्यासाठी जी खेळपट्टी तयार करण्यात आली होती, ती प्रथम श्रेणी दर्जाची नव्हती. तीन दिवसांच्या आत सामना संपला होता. या सामन्यात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. राजस्थानच्या पंकज सिंगने नऊ विकेट घेतल्या होत्या.

तटस्थ मैदानाच्या संकल्पनेमुळे काही सामने दुर्गम ठिकाणी झाले. तेथे प्रवास करणे फारच जिकिरीचे होत होते. मुळात दोन सामन्यांमध्ये तीन दिवसांची विश्रांती होती. अशा वेळी जास्त वेळ बस-प्रवासातच जात असायचा, अशी टीका गुजरातचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने केली. यजमान संघटनांच्या निरुत्साहावरही पटेलने निराशा व्यक्त केली.

जेथे कोणीच प्रेक्षक सामने पाहण्यासाठी येत नाहीत, अशा ठिकाणी सामने आयोजित करून काय साध्य केले? घरच्या मैदानावर खेळताना बऱ्यापैकी तरी प्रेक्षक यायचे. पुढच्या मोसमापासून घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळेल.
-अक्षर पटेल
 

किती स्पोर्टिंग विकेट तयार करण्यात आल्या होत्या आणि किती सामने निकाली ठरले? किती सामने तीन दिवसांच्या आत संपले? तर किती पाटा पट्ट्यांवर फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला, याबाबत बीसीसीआयने माहिती जाहीर करावी, असे काही खेळाडूंचे मत आहे. 
-अभिनव मुकुंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com