मुंबई : रक्तदाब कमी झाल्याचा त्रास झाल्यावरही काही तासातच शरथ कमल कोर्टवर उतरला आणि त्याने भारतास आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या चॅम्पियनशिप गटात स्थान मिळवून दिले. भारताला या स्पर्धेत आता पाचवा क्रमांक मिळवण्याची संधी आहे.
जी साथीयनने जागतिक क्रमवारीत पाचव्या असलेल्या हारीमोतो तोमाकाझू याचा पराभव केला; तरीही भारतास आशियाई सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत जपानविरुद्ध 1-3 अशी हार पत्करावी लागली. मात्र, त्यानंतर भारताने सिंगापूरला 3-0 असे हरवले. आता पाचव्या क्रमांकासाठी लढत हॉंगकॉंगविरुद्ध होईल. साथीयनने
विजयी सुरुवात करून दिल्यावर शरथने पहिले दोन गेम गमावल्यावर विजय मिळवला. त्याला सुरुवातीस थकवा जाणवत होता, पण तरीही तो नेटाने खेळला. अँथनी अमलराजने तिसरी एकेरीची लढत जिंकत भारतास विजयी केले.
भारताने अव्वल सहा संघात प्रथमच स्थान मिळवले आहे. ही कामगिरी नक्कीच मोलाची आहे. भारतास हे यश मिळवून देऊ शकलो याचे समाधान आहे, असे शरथ कमलने सांगितले. जपानविरुद्धची परतीची लढत खेळताना शरथची प्रकृती बिघडली. त्याला कमी रक्तदाबाचा त्रास झाला होता, पण तरीही तो सिंगापूरविरुद्धच्या लढतीसाठी मैदानात उतरला आणि भारत पुढील वर्षी स्पर्धेतील सर्वोत्तम गटात खेळणार हे निश्चित केले.
तत्पूर्वी साथीयनने 16 वर्षीय जपानी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एकही गेम न गमावता 3-0 बाजी मारली. त्याने 11-4, 11-7, 12-10 असा विजय मिळवला. अनुभवी शरथ कमल माहारु याशिमुराविरुद्ध 1-3, तर हारिमोतोविरुद्धची लढत त्याला अर्धवट सोडावी लागली. हरमित देसाईला ताकुया जिनविरुद्ध 0-3 अशाच पराभवास सामोरे जावे लागले.
|