भारत-बांगलादेश दुसरी उपांत्य लढत आज

भारत-बांगलादेश दुसरी उपांत्य लढत आज

बर्मिंगहॅम - चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत यंदा एकतर सर्वाधिक खेळ पावसाचा झाला आणि उर्वरित स्पर्धा बांगलादेश क्रिकेट संघाच्या सनसनाटी कामगिरीने लक्षात राहिली. आयसीसी स्पर्धेत एक तरी सनसनाटी निकाल नोंदविण्याची मालिका बांगलादेशाने येथेही कायम राखली. त्याने न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणताना अन्य संघांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. आता त्यांची दखल घेण्याची वेळ भारताची आहे. भारतीय संघदेखील अडचणीतून मार्ग काढत उपांत्य फेरीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे गतविजेत्या भारतीय संघाला पारडे जड असूनही सावधगिरी बाळगण्याचे आव्हान आहे. 

प्रतिस्पर्धी संघ बघता भारताची बाजू वरचढ राहणार हे कुणीही सांगू शकेल. कागदावर दोन्ही संघ बघितले तर बलवान कोण? याचे उत्तर कुणीही देऊ शकेल; पण या अंदाजाला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही. सामन्याच्या दिवशी तुमचा खेळ कसा होतो, यावर सगळे अवलंबून असते. कॅरेबियन भूमीत २००७ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत बांगलादेशाने भारताला धक्का दिला होता. अर्थात, त्यानंतर भारताने आपल्या शेजारील राष्ट्राला फारशी संधी दिलेली नाही. फरक इतकाच पडला आहे की, गेल्या तीन वर्षात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बांगलादेशाची लक्षणीय सुधारणा झाली आहे. आता ते कुठल्याही संघाला ताठ मानेने प्रत्युत्तर देऊ शकतात. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत झालेला पराभव भारतीय संघ अजून विसरलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत खेळताना बांगलादेशाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविलेला संघच भारत कायम ठेवेल. बांगलादेशदेखील संघात फारसा बदल करणार नाही, असेच दिसून येत आहे. 

यंदाच्या स्पर्धेत तीनही सामन्यांत भारतीय फलंदाजांनी चोख भूमिका बजावली आहे. यातही शिखर धवन प्रतिस्पर्धी गोलंदाजांची डोकेदुखी ठरला आहे. विराट कोहलीलादेखील चांगली लय गवसली आहे. त्यातच अश्‍विनचा समावेश झाल्याने भारतीय गोलंदाजीत समतोल राखला आहे. बांगलादेश संघानेदेखील फलंदाजीत चमक दाखवली आहे. तमिम इक्‍बाल, मुशफिकूर रहिम, शकिब अल हसन, महमुदुल्ला असे त्यांचे फलंदाज संघासाठी उपयुक्त ठरले आहेत. खेळपट्टी फलंदाजांचे लाड पुरविणारी असल्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशाच्या या फॉर्ममधील फलंदाजांना रोखावे लागेल. उपांत्य फेरीसाठी खेळपट्टी भरपूर रोलिंग केलेली असेल. त्याचबरोबर गवतदेखील काढलेले असेल. 

भारतीय फलंदाज फॉर्ममध्ये असल्यामुळे बांगलादेशाच्या गोलंदाजांचीदेखील कसोटी लागेल. धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या अशी भारतीय फलंदाजीची फळी खोलवर असल्यामुळे बांगलादेशाच्या गोलंदाजांना सर्वस्व पणाला लावावे लागेल. त्यामुळेच मश्रफी मोर्तझा, टस्किन अहमद, शकिब हसन आणि मेहदी हे गोलंदाज आपल्या संघासाठी सर्वस्व पणाला लावतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com