कामगिरी उंचावण्याचे भारतासमोर आव्हान

कामगिरी उंचावण्याचे भारतासमोर आव्हान

मुंबई - तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रलियाकडून सपाटून मार खाणाऱ्या भारतीय संघाने ट्‌वेन्टी-२० मालिकेत बाजी पलटवण्याचा निर्धार केला आहे. इंग्लंड संघाचाही समावेश असलेली तिरंगी ट्‌वेन्टी-२० स्पर्धा उद्यापासून मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होत आहे. 

महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम असलेल्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड-भारत या तीन देशांमधील ट्‌वेन्टी-२० सामन्यांचा थरार पहाण्याची संधी मिळणार आहे. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठून अपेक्षा उंचावणाऱ्या भारतीय संघाला पुन्हा एकदा नवी सुरवात करावी लागणार आहे. 

गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-२० मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाची गाडी ऑस्ट्रेलियाने बडोद्यात रोखली. या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून सुरू होणारी तिरंगी स्पर्धा महत्त्वाची आहे. महिला आयपीएलचे नारे घुमत असताना अनुभवी खेळाडू मितालीने कालच वास्तव मांडले. अजून दुसरी फळीच तयार झालेली नसल्यामुळे आयपीएलचा विचार सध्या दूरच ठेवलेला बरा असे ती म्हणाली होती. त्यामुळे भारतीय महिलांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 

जूलानचे पुनरागमन
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातच जखमी झालेली अनुभवी वेगवान गोलंदाज जुलान गोस्वामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळू शकली नव्हती. तिरंगी स्पर्धेसाठी ती तंदुरुस्त झाली असून तिच्या अनुभवाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. बडोद्यातील घरच्या मैदानावर भारतीय फिरकी गोलंदाजांऐवजी ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाज यशस्वी ठरल्या होत्या. ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असल्यामुळे दीप्ती शर्मा आणि पूनम यादव या फिरकी गोलंदाजांना पुन्हा एकदा शर्थ करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com