आता तरी सरकारचा दृष्टिकोन बदलेल - आंचल

आता तरी सरकारचा दृष्टिकोन बदलेल - आंचल

नवी दिल्ली - दुर्लक्षित असलेल्या स्किईंग क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविणाऱ्या आंचल ठाकूर हिने ‘किमान या पदकानंतर तरी सरकारचा ‘विंटर स्पोर्ट्‌स’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतीय हिवाळी गेम्स महासंघाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसल्याकडे देखील तिने लक्ष वेधले.

आंचलने मंगळवारी तुर्कस्तान येथे झालेल्या स्किईंगच्या ‘एल्पाईन एजर ३२००’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्लालम या स्पर्धा प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

आंचलच्या या कामगिरीचे कौतुक थेट पंतप्रधान यांनी ट्विटरवरून केले. तुर्कीहून वृत्तसंस्थेशी बोलताना आंचलने पंतपधानांनी आपल्या कामगिरीची दखल घ्यावी हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे सांगितले. ती म्हणाला, ‘‘पंतप्रधान आपल्या कामगिरीचे कौतुक करतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. भारतीय हिवाळी गेम्स महासंघाला आपल्याकडे सरकारची मान्यताही नाही. किमान आता तरी सरकारचा या क्रीडा प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.’’

चंडीगड येथे डीएव्ही महाविद्यालयात शिकणारी २१ वर्षीय आंचल म्हणाली, ‘‘आम्ही खेळाडूदेखील मेहनत करत असतो. दिवस दिवस सराव करून आम्ही स्पर्धेत जिगरबाज कामगिरी करून दाखवत असतो. आमच्याही कामगिरीला दाद मिळायला हवी.’’ आंचलचे वडील रोशन भारतीय विंटर गेम्स महासंघाचे सचिव आहेत. वडिलांनी प्रोत्साहन दिले नसते, तर मी आज इथपर्यंत पोचू शकले नसते, असेही तिने सांगतिले. ती म्हणाला, ‘‘वडिलांचे प्रोत्साहन नसते, तर मी हा खेळ कधीच निवडला नसता. वाच्या सातव्या वर्षांपासून मी युरोपमध्ये स्किईंग करत आहे. त्यांनी मला घडवण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. सरकारकडून कधीच मदत मिळाली नाही. या खेळात कारकीर्द घडविण्यासाठी त्यांनी माझ्यासह माझ्या भावावर किती खर्च केला याची तुम्ही कल्पानाही करू शकत नाही. भारतात बर्फ पडत नसल्यामुळे आम्हाला प्रत्येकवेळी परदेशातच सराव करायला जावे लागले.’’ तिच्या वडिलांनी गुलमर्ग आणि औली येथे स्किईंगचे केंद्र सुरू केले. मात्र, केवळ स्पर्धा वगळता या केंद्रांकडे कुणी बघतदेखील नाही हे दुर्दैव असल्याचेही मत तिने व्यक्त केले.

ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य
या कामगिरीनंतर आता दक्षिण कोरियात प्यांगचाँग येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकसाठी पात्रता गाठणे हे आपले लक्ष्य असल्याचे तिने सांगितले. अर्थात, हे एक आव्हान आहे, असे तिने सांगितले. ती म्हणाली, ‘‘ऑलिंपिक पात्रतेसाठी किमान पाच रेसमध्ये तुम्ही १४० पेक्षा कमी गुण मिळविणे अपेक्षित असते. मला ब्राँझ मिळालेल्या शर्यतीत सुवर्णपदक विजेताही हे लक्ष्य गाठू शकलेला नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com