बंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी भारताचा नवा कर्णधार महेश भूपती याने अजूनही उझबेकिस्तानविरुद्धच्या दुहेरीच्या लढतीविषयी निर्णय घेतलेला नाही. आशिया-ओशियाना गटातील उझबेकिस्तानविरुद्धची लढत शुक्रवारपासून (ता. 7) बंगळूर येथे सुरू होत आहे.
भूपतीने या लढतीसाठी संघ जाहीर करताना एकेरीत खेळणाऱ्या चारही खेळाडूंना पसंती दिली आहे. दुहेरीतील तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या लिएँडर पेस आणि रोहन बोपण्णा यांना त्याने राखीव खेळाडूत स्थान दिले आहे. या लढतीसाठी सराव शिबिर सुरू होतानाच एकेरीतील एक खेळाडू युकी भांब्री याने दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली आहे. यानंतरही भूपतीने आजच्या सराव सत्रानंतरही दुहेरीत कोण खेळणार हे सांगण्यास नकार दिला.
सराव सत्रानंतर भूपती म्हणाला, 'आम्ही एखाद्या विजयाचा विचार करत नसून, या लढतीतून पूर्ण तीन गुण कसे मिळतील याला महत्त्व देत आहोत. दुहेरीत कोण खेळणार, याविषयी आठवडाभर चर्चा सुरू आहे. पण, अजून दोन दिवस तरी आपण या संदर्भात भाष्य करणार नाही.''
भूपतीने या वेळी डेव्हिस करंडक लढतीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल याबाबत शंका उपस्थित केली. तो म्हणाला, 'तीन दिवसांची लढत दोन दिवसांत संपवणे कठिण आहे. संयोजकांनी दोन दिवसांच्या लढतीत दुहेरीच्या लढतीचे नियोजन करणेच कठिण जाणार आहे. अशा वेळी प्रमुख खेळाडू दुहेरीत खेळण्यास कितपत राजी होतील हेदेखील सांगणे कठिण आहे.''
उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीविषयी भूपती म्हणाला, ""या लढतीसाठी कोर्ट वेगवान बनवण्यात आले आहे. आपल्या संघात वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला आहे. सरावदेखील अशाच कोर्टवर सुरू आहे.''
डेव्हिस करंडक लढतीचा निकाल दुहेरीवर अवलंबून असतो असे मला वाटत नाही. आपण नेहमीच दुहेरीत सर्वोत्तम जोडी दिली. मी आणि पेसने सलग 22 विजय नोंदवले. पण, भारताने किती लढती जिंकल्या. प्रत्येक वेळेस असेच घडेल असेही नाही.
- महेश भूपती, भारतीय संघाचा कर्णधार
|