
virat kohli : स्वतःवर अपेक्षांचे ओझे वाढवत होतो ; विराट
अहमदाबाद : संघाच्या हितासाठी आपण प्रदीर्घ काळ निर्णायक योगदान देऊ शकत नाही, ही चिंता टोचत होती; पण त्याच वेळी मोठी शतकी खेळी करण्यास प्रेरणा मिळावी, यासाठी स्वतःवरचे अपेक्षांचे ओझे वाढवत होतो, अशी कबुली अहमदाबाद कसोटीत झुंझार १८६ धावा करणाऱ्या विराट कोहलीने दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजी करू शकणार नाही, हे समजतात खेळपट्टीवर नांगर टाकून विराट कोहलीने १८६ धावा केल्या. साडेतीन वर्षांनंतर कोहलीने कसोटी शतक साजरे केले हे त्याचे २८ वे कसोटी शतक होते आणि ७५ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले.
चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहलीची मुलाखत घेतली, या मुलाखतीत विराटने मनमुरादपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.
खरे सांगायचे, तर मोठी शतकी खेळी करण्यासाठी माझ्यामध्ये काही कमतरता येऊ लागली होती आणि त्यावर मात करायची असेल, तर मनातली गुंतागुंत वाढू दिली होती, असे सांगून विराट म्हणतो, शतक करण्याची इच्छाशक्ती जेव्हा प्रबळ होत जाते तेव्हा आपण फलंदाज म्हणून प्रगती करत असतो.
माझ्या बाबतीत तसेच काहीसे होत असते. कारण मी ४०-५० धावांवर समाधान मानाणारा फलंदाज नाही, संघासाठी पूर्ण योगदान देणे, हाच माझा आत्मसन्मान असतो. प्रदीर्घ काळ शतक होत नव्हते, त्यानंतर मोठी खेळी करण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी करणे किती कठीण होते, या द्रविड यांच्या प्रश्नावर विराट म्हणतो... खरोखरीच तो काळ कठीण असतो.
हॉटेलच्या रूममधून बाहेर पडतो तेव्हा लिफ्टमध्ये असलेली व्यक्ती किंवा बसचालक असे प्रत्येक जण माझ्याकडे शतकाची मागणी करत असायचा. त्यामुळे हाच विचार सतत मनात घोळत रहायचा, असे असले, तरी इतके प्रदीर्घ काळ खेळत रहाण्याची हीच तर खरी गंमत असते, अशा प्रकारच्या वाढत्या अपेक्षा मार्ग निर्माण करत असतात.
विराट कोहलीकडून मोठी शतकी खेळी पाहण्यासाठी आपणही फार उत्सुक होतो आणि त्याने एक अफलातून शतकाचा सादर केलेला नजराणा सादर केला, असे द्रविड यांनी सांगितले. द्रविड पुढे म्हणतात, विराटची अनेक शतके मी टीव्हीवरून पाहिली आहेत. १५-१६ महिन्यांपूर्वी मी भारतीय संघाचा प्रशिक्षक झालो तेव्हापासून मी विराटकडून कसोटी शतकाची प्रतीक्षा करत होतो.
जेव्हा जेव्हा मी ४० च्या आसपास धावा करायचो तेव्हा तेव्हा किमान १५० धावांपर्यंत करू शकतो, असा विश्वास वाटायचा; परंतु ते शक्य व्हायचे नाही, तेव्हा मात्र चिंता खात असायची.
विराट कोहली