न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप (Womens World Cup 2022) स्पर्धेतून भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत भारतीय महिला संघाला (India Women's) दक्षिण आफ्रिकेकडून 3 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या पराभवामुळे वेस्ट इंडीज संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी आधीच आपली जागा पक्की केली होती.
भारतीय महिला संघाच्या पराभवावर दिग्गज क्रिकेटर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात व्यक्त होताना त्याने अखेरच्या षटकात दीप्ती शर्माने (Deepti Sharma) टाकलेल्या नो बॉलचाही उल्लेख केलाय. विरेंद्र सेहवागने ट्वीटमध्ये लिहिलंय की, “तो केवळ एक नो बॉल नव्हता तर त्यामुळे भारतीय संघाला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावे लागले आहे. कधी कधी अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. हे क्षण काही दशक स्मरणात राहतात. काहींचे करियर संपते, अशा शब्दांत त्याने भारतीय संघाचा शेवट हा निराशजन झाल्याचे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये 'नो बॉल'मुळं पदरी निराशा पडण्याची ही पहिली वेळ नव्हती. 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत बुमराह आणि 2016 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये अश्विन आणि बुमराहनं टाकलेले नो बॉल भारतीय संघाला चांगलेच महागात पडले होते. यात आता दीप्तीच्या नो बॉलची भर पडली आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील 'करो वा मरो' लढतीत भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 बाद 274 धावा केल्या होत्या. मिताली राज, स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या तिघींनी अर्धशतकी खेळी केली. हरमनप्रितीनंही चांगला खेळ केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड वाटत असताना दीप्तीनं नो बॉल टाकला आणि सामना फिरला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.