मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणास तोडीस तोड उत्तर दिले आणि टोकियोत सुरु असलेल्या ऑलिंपिक चाचणी हॉकी स्पर्धेतील लढत 2-2 अशी बरोबरीत सोडवली.
वंदना कटारिया आणि गुरजीत कौरने प्रत्येकी एक गोल करीत भारतास दोनदा पिछाडीवरून बरोबरी साधून दिली. जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दुसरे; तर भारत दहावा आहे. मात्र हा फरक क्वचितच दिसला. पहिल्या दोन सत्रात ऑस्ट्रेलियाची एकतर्फी हुकुमत होती; पण विश्रांतीनंतर भारतीयांनी चांगली प्रति-आक्रमणे करीत हार टाळली.
भारताच्या या बरोबरीचे श्रेय सविताच्या गोलरक्षणासही द्यायला हवे. तिने ऑस्ट्रेलियाच्या चाली रोखत सहकारी खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. चौथ्या सत्रात भारतीय आक्रमणे जास्त योजनाबद्ध झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने बचावाकडे लक्ष दिले; पण अखेर एक मिनिट असताना भारताने बरोबरी साधली.
पुरुष संघाची न्यूझीलंडविरुद्ध हार
अखेरच्या मिनिटात गोल स्वीकारण्याचे भारतीय हॉकीचे दुखणे पुन्हा उफाळून आले आणि पुरुष संघाला न्यूझीलंडविरुद्ध 1-2 हार पत्करावी लागली. कर्णधार हरमनप्रीतने दुसऱ्याच मिनिटास गोल करीत भारतास आघाडीवर नेले; पण त्याचा फायदा घेण्यात भारतीय अपयशी ठरले. भारतीय संघाने 47 व्या आणि अखेरच्या मिनिटास गोल स्वीकारत लढत गमावली.
|