पंचांचा पक्षपात अन्‌ बजरंगची हार

जागतिक कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य लढतीतील पराभवाने निराश झालेला बजरंग पुनिया
जागतिक कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य लढतीतील पराभवाने निराश झालेला बजरंग पुनिया

मुंबई : जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या बजरंग पुनियाला जागतिक कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराजित व्हावे लागले, पण हा पराभव यजमान कझाकस्तानचा दौलेत नियाझबेकोव याला पंचांनी झुकते माप दिल्यामुळेच घडल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर समाजमाध्यमांवरून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

नूर सुलतान (कझाकस्तान) येथे सुरु असलेल्या स्पर्धेत भारतास बजरंगकडून जागतिक विजेतेपदाचीच अपेक्षा होती, पण 65 किलो गटाच्या उपांत्य फेरीची लढत 9-9 अशी बरोबरीत सुटली आणि कुस्तीतील बरोबरीची कोंडी फोडण्याच्या नियमानुसार बजरंगला हार पत्करावी लागली. त्यात एकावेळी कझाक प्रतिस्पर्ध्यास चार गुण देण्याचा निर्णय निर्णायक ठरला आणि त्याबाबतच भारतास आक्षेप होता.

बजरंगची सुरुवात चांगली नव्हती. तो सुरुवातीस 0-2 मागे पडला होता. दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीस कझाक कुस्तीगीरास बजरंगला खाली पाडल्याबद्दल चार गुण देण्यात आले. बजरंगने या चालीची सुरुवात करूनही प्रतिस्पर्ध्यास गुण देण्यात आले. बजरंगने त्या निर्णयास आव्हान दिले, पण ते अपील फेटाळले गेले. काही वेळातच बजरंग 2-7 मागे पडला. फार वेळ शिल्लक नसल्याने बजरंग आक्रमक झाला. त्याने झटपट गुण घेतले. त्याने 9-9 बरोबरी साधली. जोषातील बजरंग एक गुण कधीही घेईल, असे वाटत असतानाच लढत संपली. त्या वादग्रस्त चार गुणांनीच बजरंग पराजित झाल्याचे जाहीर करण्यात आले.

काय वादग्रस्त?
- बजरंगने आक्रमण सुरू केल्यावरही कझाक प्रतिस्पर्ध्यास पूर्ण चार गुण कसे?
- काही कुस्ती अभ्यासकांच्या मते यावेळी मार्गदर्शकांनी आव्हान दिले नसते, तर त्याबद्दलचा गुण कझाक प्रतिस्पर्ध्यास मिळाला नसता.
- बजरंगला देण्यात आलेले तीन गुण मॅट चेअरमनकडून रद्द
- बजरंग अखेरच्या मिनिटात जोषात असताना प्रतिस्पर्धी वेळ घालवत होता, तरीही त्याला ताकीद का नाही?
- किमान तीनदा त्याला याबद्दल ताकीद नाही, याबद्दलचा तांत्रिक गुणाचा दंडही नाही.

बजरंगच्या उपांत्य लढतीत कोण जिंकले, काय खरे होते काय खोटे हे कोणीही सहज सांगू शकेल, मग तेथील पंचांना ते का दिसले नाही. जागतिक स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत ही चूक कशी होते. कझाकचा कुस्तीगीर खूपच चुकीचा खेळत होता.
- योगेश्‍वर दत्त

स्पर्धेत काय घडले
- बजरंगप्रमाणेच रवी कुमारची ऑलिंपिक पात्रता
- रवी कुमार 57 किलो गटाच्या उपांत्य फेरीत रशियाच्या झावूर उगुएवविरुद्ध 4-6 पराजित
- बजरंग आणि रवी कुमार ब्रॉंझपदकाची लढत खेळणार
- साक्षी मलिक पात्रतेपासून दूर. उपउपांत्यपूर्व फेरीत हार, रिपेचेजसचीही संधी नाही.

बरोबरीनंतर असा होतो निर्णय
- लढतीत जो मल्ल एकावेळी सर्वाधिक गुण जिंकतो, तो विजयी.
- हे गुण समान असल्यास ज्याला सर्वांत कमी ताकीद मिळते तो विजयी.
- यानंतरही कोंडी न फुटल्यास जो मल्ल अखेरचा गुण घेतो तो विजयी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com