
Wrestler Protest Timeline : अमित शहांची भेट अन् कुस्तीपटू पुन्हा परतले सरकारी सेवेत; 138 दिवसात काय घडलं?
Wrestler Protest 138 Days Timeline : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर दोनवेळा आंदोलन केले. पहिले आंदोलन हे चौकशी समिती स्थापून क्रीडा मंत्रालयाने थोपले होते.
मात्र या समितीच्या अहवालाबाबत नाराजी व्यक्त करत कुस्तीपटूंनी दुसऱ्यांना जंतर मंतरवर आंदोनल सुरू केले. या आंदोलनादरम्यान बृजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन एफआयआर देखील दाखल झाल्या. मात्र आंदोलक कुस्तीपटू बृजभूषण यांना अटक करण्यात यावी या मागणीवर ठाम होते.
देशाचे पदक विजेते कुस्तीपटू 138 दिवस आंदोलन करत होते. 18 जानेवारीला पहिल्यांदा कुस्तीपटूंनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर 23 एप्रिलला दुसऱ्यांदा त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनावेळी कुस्तीपटूंची आणि पोलिसांची झटापट देखील झाली.
यानंतर नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पोलिसांनी बळाचा वापार करत कुस्तीपटूंना जंतर मंतरवरून हलवले. यामुळे आंदोलनाला वेगळेच वळण लागले. मात्र अमिश शहा यांच्यासोबत मध्यरात्री बैठक झाली अन् कुस्तीपटू पुन्हा आपल्या सरकारी सेवेत रूजू झाले. जरी ते सेवेत रूजू झाले असले तरी त्यांनी आदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
असे सुरू झाले कुस्तीपटूंचे आंदोलन
- 18 जानेवारी रोजी 30 भारतीय कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर - मंतरवर आंदोलन सुरू केले. या आंदोलनचे नेतृत्व बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट करत होते. या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर संघटनेत मनमानी कारभार करणे आणि महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्याचे आरोप केले.
- 21 जानेवारी रोजी भाजप खासदार असलेल्या बृजभूषण यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले. अनेक अधिकाऱ्यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली मात्र तोडगा काही निघाली नाही. अखेर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली आणि 21 जानेवारीला आंदोलन मागे घेण्यात आले. बृजभूषण यांना कुस्ती महासंघाच्या कामकाजापासून दूर राहण्यास सांगितले.
- दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याऱ्या समितीला एप्रिलमध्ये अहवाल सादर करायचा होता. समितीने उशिरा अहवाल सादर केला. हा अहवाल कधी सार्वजनिक झाला नाही. मात्र याचदरम्यान या अहवालात बृजभूषण यांना निर्दोष ठरवण्यात आल्याची बातमी आली.
- 23 एप्रिलला कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा जंतर - मंतरवर आंदोलन सुरू केले. बृजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलनचा हत्यार उपसले. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
- कुस्तीपटूंचे हे आंदोलन दिवसागणिक मोठं होत गेलं मात्र बृजभूषण निर्दोष असल्याचे सांगत होते. 23 एप्रिललाच दिल्लीच्या कनौट प्लेस पोलीस ठाण्यात बृजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक शोषण प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केली नव्हती.
- 25 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिल्ली पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास सांगितली. यावेळी बृजभूषण यांच्याविरूद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या. यातील एक एफआयआर पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आली.
- दिल्ली पोलीसांनी दोन एफआयआर दाखल करून देखील बृजभूषण यांना अटक झाली नाही. त्यामुळे कुस्तीपटूंनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यानच्या काळात बृजभूषण यांच्याकडून अनेक वक्तव्य करण्यात आली. त्याला कुस्तीपटूंनी देखील प्रत्युत्तर दिले.
- 29 एप्रिल ते 1 मे या दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आप पक्षाचे नेते आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भेट घेतली.
- 4 मे सर्वोच्च न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्यविरूद्धची महिला कुस्तीपटूंची याचिका फेटाळून लावत त्यांना खालच्या न्यायालयात दाद मागण्यास सांगितले.
- 27 एप्रिलला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या तीन सदस्यांची समिती स्थापन करून भारतीय कुस्ती महासंघाचे दैनंदिन कामकाजावर देखरेख करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या समितीवर 45 दिवसात भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूक घेण्याची देखील जबाबदारी देण्यात आली. या समितीत सुमा शिरूर, भुपेंद्रसिंह बाजवा आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश यांचा समावेश करण्यात आला. पीटी उशाने कुस्तीपटूंच्या आंदोलनावर टीका केली.
- 7 मे कुस्तीपटूंच्या या आंदोलनात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची एन्ट्री झाली. त्यांनी जंतर मंतरवर जाऊन कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यानंतर अनेक वक्तव्य दोन्ही बाजूकडून झाली.
- 23 मे कुस्तीपटूंनी कँडल मार्च आयोजित केला. यात खाप पंचायतींनी देखील सहभाग घेतला.
- 28 मे यानंतर कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनावर शांतीपूर्ण मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या या भागात 144 कलम लागू असतानाही कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्ली पोलीसांनी हे आंदोलन मोडून काढत कुस्तीपटूंना बळाचा वापर करत ताब्यात घेतले.
- 30 मे दिल्ली पोलीसांनी बळाचा वापर करत जंतर मंतरवरून कुस्तीपटूंना हलवले. मात्र यानंतर कुस्तीपटूंनी त्यांची सर्व पदके ही गंगेत प्रवाहित करण्याची धमकी दिली. कुस्तीपटू हरिद्वारला पोहचल्या देखील मात्र शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी त्यांची समजूत काढली अन् त्यांना पदके प्रवाहित करण्यापासून रोखले.
- 4 जून कुस्तीपटूंनी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत काय झाले हे सविस्तरित्या काही बाहेर आले नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी कुस्तीपटूंना पोलिसांचे काम त्यांना करू द्या त्यांना थोडा वेळ द्या असे सांगितले.
- 6 जून आंदोलनातील बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट हे सर्व महत्वाचे कुस्तीपटू पुन्हा एकदा आपल्या सरकारी सेवेत रूजू झाले. मात्र साक्षी मलिकने ट्विटकरून सांगितले की जरी भारतीय रेल्वेमध्ये आमचे कर्तव्य बजावण्यासाठी आम्ही रूजू झालो असलो तरी आंदोलन सुरूच राहणार आहे.