वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला आहे. या फायनलमध्ये भारताला स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची उणीव भासू शकते.
कार अपघातानंतर पंत टीम इंडियामधून बाहेर आहे. सध्या तो उपचार घेत आहे. निवड समितीने पंतच्या जागी इशान किशन आणि श्रीकर भरत यांची संघात यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. आता पंतच्या जागी कोण संघात सामील होतो हे पाहण्यासारखे आहे.
गेल्या काही वर्षांत पंतचा कसोटीतील कामगीरी अत्यंत प्रभावी ठरला आहे. पदार्पणापासूनच पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 डावांत 62.4 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 72.13 राहिला आहे. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. पदार्पणापासूनच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत तो चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
या बाबतीत चेतेश्वर पुजारा अव्वल स्थानावर आहे. त्याने 2015 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 16 कसोटी सामन्यांच्या 28 डावांमध्ये 49.51 च्या सरासरीने 1337 धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र या सर्वात 2020/21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ब्रिस्बेनमध्ये पंतची संस्मरणीय खेळी कोण विसरू शकेल.
इंग्लडमध्ये पंतचा जलवा
पंतचा इंग्लंडमधील रेकॉर्डही खूप दमदार राहिले आहे. पंतने 2015 पासून इंग्लंडमध्ये नऊ कसोटीत 556 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. या काळात भारतासाठी इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे.
पंत 2020 सालापासून भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 2020 पासून कसोटीत 1500+ धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. यादरम्यान पंतने 38 डावात 43.34 च्या सरासरीने 1517 धावा केल्या.
या यादीत चेतेश्वर पुजारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 50 डावांमध्ये 30.08 च्या सरासरीने 1414 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्मा 30 डावांमध्ये 44.21 च्या सरासरीने 1238 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हे विक्रम पाहता भारतीय संघाला पाच-सहाव्या क्रमांकावर पंतसारख्या आक्रमक फलंदाजाची उणीव भासेल.
दुसरीकडे, इशान किशन आणि भरतबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचा आतापर्यंतचा कसोटी रेकॉर्ड काही खास राहिलेला नाहीये. इशानला अद्याप कसोटी पदार्पण करता आलेले नाही, तर भरतने चार कसोटीत 20.2 च्या सरासरीने 101 धावा केल्या आहेत. भारताला कसोटी चॅम्पियन बनायचे असेल तर इशान आणि भरत यांना संधी मिळेल तेव्हा त्यांनी धावा करणे गरजेचे आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.