थॉट ऑफ द वीक : भूतकाळाचे नक्की करायचे काय?

थॉट ऑफ द वीक : भूतकाळाचे नक्की करायचे काय?

मेघा, २९ वर्षांची तरुणी! आपल्या कंपनीतील ग्रुपबरोबर जेवायला गेली. मेन्यू कार्ड येताच तिने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, ‘किती कमी व्हरायटी आहेत इथे.’

त्यानंतर पूर्ण जेवण होईपर्यंत तिची काही न काही तक्रार सुरूच होती. घरी आल्यानंतरसुद्धा ऑफिसमधील प्रत्येक व्यक्तीची तक्रार चालू झाली.

दुसऱ्या दिवशी आपल्याकडे पाहुणे येणार असे कळताच, ते पाहुणे किती चुकीचे वागतात, याची तक्रार चालू झाली. तिची समजूत काढायचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, त्यावर तिची प्रतिक्रिया ‘कायम माझ्याच बाबतीत असे का होते?’, ‘कायम मीच का पडती बाजू घ्यायची?’, ‘कायम मीच का समजून घ्यायचे?’ अशी होती. थोडा कालावधी गेल्यानंतर ती खूप विचार करू लागली. तिला जाणवले, की आपल्या अशा प्रतिक्रियेसाठी भूतकाळातील काही घटना कारणीभूत आहेत. भूतकाळाला दोष देणे चालू झाले. काहीही घडू दे, भूतकाळ कारणीभूत होऊ लागला. तिचे भावनिक ट्रिगर वाढतच गेले. त्यामुळे तिची अनेक जवळची नाती दुरावली. कालांतराने मेघाच्या लक्षात आले, आपण भूतकाळाला खूप दोष देत आहोत. हे तिने काही जवळच्या लोकांबरोबर शेअर केले. सर्वांकडून एकच उत्तर आले ते म्हणजे ‘लेट गो’. भूतकाळाला विसरून जा, नव्याने आयुष्य चालू कर. पण, तिला ते कठीण जात होते. कितीही म्हणाले तरी भूतकाळ विसरणे शक्य नव्हते. कारण, त्यामुळेच वर्तमान काळातील समस्या उद्‍भवत होत्या.

मेघासारख्याच आपल्याही काही समस्यांचा उगम भूतकाळात असतो. तो भूतकाळ ‘लेट गो’ करायला का अवघड जाते? या भूतकाळाचे नक्की करायचे काय? उत्तर अगदी सोपे आहे.

भूतकाळाला ‘एक वाईट काळ’ म्हणू नका
भूतकाळाला आपण कायम दोष देत राहतो, कारण आपण त्याला एक ‘वाईट काळ’ म्हणून बघतो. आपण त्याच काळाला एक शाळेतील वर्ग म्हणालो तर? फक्त इथे परीक्षा आधी येते आणि धडा नंतर मिळतो. त्यामुळे भूतकाळाला एक ‘वाईट काळ’ म्हणून न पाहता एक ‘महत्त्वाचा काळ’ म्हणून पाहिले, की दोष देण्याची तीव्रता तर कमी होतेच; पण त्याची जबाबदारीही आपण घेतो.

‘लेट गो’चा अट्टहास टाळा
कोणत्याही परिस्थितीमध्ये मला माझा भूतकाळ विसरायलाच पाहिजे, ही फक्त एक कल्पना आहे. ‘लेट गो’च्या जबरदस्तीपेक्षा स्वीकारणे अधिक बळ देते. अट्टहास हा दलदलीसारखा असतो. जितका वर यायचा प्रयत्न कराल तितकाच तो आत खेचतो. त्यामुळे ‘लेट गो’ अट्टहास सोडून फक्त भूतकाळाला स्वीकारा.

मी काय शिकले?
भूतकाळ हा काही ना काही स्वरूपात आपल्याला वेगवेगळे अनुभव देत असतो. त्यामध्ये आपले काम आहे, त्यातून शिकवण घेणे व मानसिकरीत्या विकसित होणे. ‘मीच का?’ यापेक्षा ‘मी काय शिकले?’ हा विचार अधिक मार्गदर्शक ठरतो.

पूर्णपणे भूतकाळ स्वीकारून, त्यातून जे शिकायला मिळाले ते आत्मसात करून मानसिकरीत्या विकास होणे म्हणजेच वर्तमान काळात जगणे!

हेच आयुष्यात पुढे जाण्याचे लक्षण आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com