नातीगोती : एकमेकांना आधार द्या

कुटुंबव्यवस्था एकमेकांच्या प्रेमावर अवलंबून असते. कौटुंबिक संबंध चांगले ठेवून, एकमेकांना समजून घेऊन व एकमेकांची काळजी घेतली, तर कुटुंबं हसतखेळत राहू शकतात.
vaishnavi kalyankar
vaishnavi kalyankarsakal

- वैष्णवी कल्याणकर

कुटुंबव्यवस्था एकमेकांच्या प्रेमावर अवलंबून असते. कौटुंबिक संबंध चांगले ठेवून, एकमेकांना समजून घेऊन व एकमेकांची काळजी घेतली, तर कुटुंबं हसतखेळत राहू शकतात.

कुटुंबात मी माझ्या आईच्या खूप जवळ आहे आणि माझं तिच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम आहे. आज मी जी काही आहे, त्याचं सर्व श्रेय माझ्या आईला जातं. तिनं माझ्यावर चांगले संस्कार आणि चांगली शिकवण दिली आहे. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यापासून, इतरांशी बोलण्यापासून, सर्वकाही मी माझ्या प्रिय आईकडून शिकले.

आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स येतात, ते आम्ही चौघं एकमेकांमध्ये शेअर करतो. माझे आई-बाबा, मी आणि माझी बहीण आम्ही चौघं एकमेकांच्या समस्या एकमेकांमध्ये शेअर करतो, त्यामुळे आम्हाला उपाय मिळतात आणि आम्ही ते सोडवण्याचा मार्ग शोधतो. हा बंध एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे माझ्या आनंदी कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे.

जेव्हाही आम्ही चौघं एकत्र असतो, तेव्हा आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एकमेकासोबत वेळ घालवतो. खूप गमती-जमती आणि गप्पा-गोष्टी करतो, त्यामुळे ती वेळ खूप मज्जेशीर असते.

आमच्या आयुष्यात एक खडतर काळ होता, आर्थिक स्थिती थोडी खालावली होती आणि त्या वेळी आम्ही चौघं एकमेकांना आधार देत होतो, एकमेकांना समजून घेत होतो आणि परिस्थितीवर खूप चांगल्या प्रकारे मात केली होती. त्यामुळे मला माझ्या कुटुंबाचा खूप अभिमान वाटतो.

नातेसंबंध चांगले होण्यासाठी आणि कौटुंबिक बंध दृढ करण्यासाठी संवाद ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या मी ‘झी मराठी’ या वाहिनीवरील ‘तू चाल पुढे'' या मालिकेत मयूरी वाघमारे हिची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणासाठी मला वेळेचं गणित जुळवावं लागतं. मात्र, मला वेळ मिळतो, तेव्हा मी तो वेळ कुटुंबासाठी देते. त्यामुळे एखादी व्यक्ती खूप व्यस्त असेल, तरीही वेळ काढून कुटुंबासोबत बोलणं किंवा वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे.

नाती दृढ होण्यासाठी.....

  • कुटुंब मजबूत ठेवण्यासाठी कुटुंबासाठी वेळ काढला पाहिजे.

  • माणूस कितीही व्यग्र असला तरीही त्यानं नेहमी कुटुंबाशी संवाद साधला पाहिजे.

  • कितीही वादविवाद असले, तरी एकमेकांना सर्व स्तरांवर समजून घ्यावं.

  • कुटुंबातील सदस्य आपल्या हिताचं सांगत असतात, त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन त्यांचं नेहमी ऐकलं पाहिजे.

  • आनंदाचे क्षण येतात; तशीच संकटंही येतात, त्यावेळी एकमेकांना आधार द्यावा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com