Loksabha 2019 : धुव्रिकरणाचा दरवाजा; भाजप खाते उघडणार?

Keral
Keral

केरळमधील राजकीय अवकाश व्यापलाय, तो मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांनीच. त्याच राज्यात आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे स्थान मिळवण्यासाठी भाजप काही वर्षांपासून प्रयत्नरत आहे; परंतु त्याला फारसे यश मिळालेले नाही. ओ. राजगोपाल हे भाजपचे एकमेव आमदार. लोकसभेच्या जागेचे खाते उघडणे हे अद्याप पक्षाचे स्वप्नच राहिले असले, तरी २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी (७ टक्के) गेल्या निवडणुकीत साडेदहा टक्‍क्‍यांवर पोहोचली. हिंदी पट्ट्यातील समीकरणे बदललेली असतानाच भाजपने केरळसारख्या राज्यांकडे अधिक लक्ष द्यायला सुरवात केली. त्याच टप्प्यावर शबरीमला मंदिराचा वाद उद्भवला.

भगवान अयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश दिला पाहिजे, या मागणीसाठीच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आणि हक्काचा विचार उचलून धरत मंदिराची दारे खुली करण्याचा आदेश दिला. केरळमधील सार्वजनिक जीवन या प्रश्‍नाने ढवळून निघाले. त्या लाटेवर स्वार होण्याचा आटापिटा काँग्रेस आणि भाजप अशा दोघांनीही चालवलाय. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे ‘यात्रा’ आयोजित करून या प्रश्‍नावर रान उठवले. राज्यातील नायर समाजाची ‘नायर कम्युनिटी सर्व्हिस’ ही मोठी संघटना. ती या प्रश्‍नावर पूर्णपणे डाव्या आघाडीच्या सरकारविरुद्ध गेल्यामुळे त्याचा लाभ आपल्यालाच मिळेल, असे दोन्ही पक्षांना वाटते. अलीकडेच पंधरवड्यात दोनदा पंतप्रधान मोदी यांनी केरळचा दौरा केला आणि महिलांच्या मंदिरप्रवेशाचा प्रश्‍न मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी ज्या पद्धतीने हाताळला, त्यावर झोड उठविली. नेहमी चर्चेतील काँग्रेसचे नेते शशी थरूरही याच राज्यातील आहेत. 

लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने राष्ट्रीय प्रश्‍नांची चर्चा अभिप्रेत असली, तरी राज्य सरकारची कामगिरी हा विषयही प्रचारात उपस्थित होणार. राज्यात डाव्या आघाडीचे सरकार २०१६ मध्ये सत्तेवर आले. बेघरांसाठी २८ हजार घरांची बांधणी, अतिरिक्त ३४ हजार एकर जमीन भातशेतीच्या लागवडीखाली आणणे, कोस्टल हायवे प्रकल्पाला मंजुरी, अशी कामे केल्याने मतदार डाव्या आघाडीमागे राहतील, असा विश्‍वास डाव्या नेत्यांना वाटतो.

परंतु, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न नीट न झाल्याने त्यांच्यात असंतोष आहे. शेतीचे प्रश्‍नही गंभीर आहेत. इडक्की जिल्ह्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पुराचा पर्यटनाला फटका बसला. राजकीय वैमनस्यातून कार्यकर्त्यांच्या हत्या सुरूच आहेत. या मुद्यांच्या आधारे लोकमत वळविता येईल, असे काँग्रेस किंवा भाजपला वाटत असले, तरी या दोघांनाही पर्यायी चेहरा उभा करण्यात अपयश आलंय. सक्षम उमेदवारांची चणचण आहे. अभिनेते, खेळाडू अशा सेलिब्रिटींना उमेदवारीसाठी साकडे घालण्याची वेळ दोन्ही पक्षांवर आलेली दिसते.

२०१४ चे पक्षीय बलाबल
एकूण जागा - २०
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) - १२
डाव्यांच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) - ८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com