मुंबई - लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. मात्र, कॉंग्रेस आघाडीतील जागावाटप, मतदारसंघांची अदलाबदल आणि उमेदवारांच्या नावाबाबत अद्यापपर्यंत घोळ सुरूच आहे.
शिवसेना- भाजपने अद्याप उमेदवार घोषित केले नसले, तरी त्यांची यादी तयार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.
कॉंग्रेस- राष्ट्रवादीतील काही जागांच्या अदलाबदलीची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. तर, इतर मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडायच्या याबाबतही अद्याप संभ्रम कायम आहे. लोकसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करून निवडणुकीच्या तयारीला लागायचे, असा निर्णय कॉंग्रेस- राष्ट्रवादीने घेतला होता. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच दोन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा सुरू झाली. आता लोकसभा निवडणूक जाहीर होऊन पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही आघाडीतील जागावाटपाचे घोडे अडलेले आहे. तर, दुसरीकडे काही जागांचे उमेदवार ठरवण्यावरून आघाडीत गोंधळ आहे.
काय आहे गोंधळ?
औरंगाबादच्या जागेबाबत आघाडीत अद्याप निर्णय नाही.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागेबाबतही अद्याप संभ्रम.
रत्नागिरी- सिंधुदुर्गच्या बदल्यात रावेरची जागा कॉंग्रेसला जाऊ शकते; मात्र अद्याप चर्चा नाही.
स्वाभिमानी संघटनेला सांगलीची जागा सोडण्याची शक्यता, अद्याप निर्णय नाही.
माढासाठी संजयमामा शिंदे आणि दीपकआबा साळुंखे यांची नावे चर्चेत.
नगरसाठी अरुणकाका जगताप किंवा त्यांचे पुत्र संग्राम जगताप यांचे नाव चर्चेत.
जालना मतदारसंघात अद्याप उमेदवार निश्चित नाही.
चंद्रपुरात बाळू धानोरकर यांना स्थानिक कॉंग्रेस नेत्यांचा विरोध.
उत्तर मुंबई मतदारसंघात तर कॉंग्रेसला उमेदवार मिळणेही मुश्कील.
हिंगोलीत कोणाला उमेदवारी द्यायची, हा प्रश्न कॉंग्रेससमोर आहे.
पुणे मतदारसंघात कॉंग्रेसकडे उमेदवार नाही. संजय काकडे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करायला इच्छुक आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
अकोला, शिर्डी, पालघर या मतदारसंघांत कॉंग्रेसकडे उमेदवारच नाही.
|