मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोणत्याही निवडणुकीत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शांतता आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांनी मंगळवारी 19 मार्च रोजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला आहे. या मेळाव्यात ते मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भातलीच ही घोषणा असेल, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केले जात आहे. 9 मार्चला झालेल्या मनसेच्या 13व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी, "लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन,' असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला होत. हा सस्पेन्स 19 मार्चला संपण्याची शक्यता असून, राज ठाकरे हे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असतील किंवा एक-दोन जागा लढवत स्वबळावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना रंगशारदा या ठिकाणी राज ठाकरेंनी बोलावले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांबाबत ते काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2014 मध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता त्या निर्णयाच्या विरोधी निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.
|