मनोमिलन कार्यकर्त्यांत उतरणार का?

Shivsena BJP
Shivsena BJP

मुंबई - लोकसभेच्या २०१४ च्या निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची ‘टाळी’ दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्यांतील विद्वेषाची दरी सांधण्याची कसोटी पणाला लागणार आहे. शिवसेनेचे दबावतंत्र यशस्वी झाले असले, तरी आता युतीधर्म पाळण्याची जबाबदारी स्थानिक शिवसैनिक कशाप्रकारे निभावतील, हा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.

भाजपच्या आक्रमक राजकारणाला शिवसेनेने रस्त्यावर उतरून सामना करण्याची एकही संधी साडेचार वर्षांत सोडली नाही. टोकाची टीका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांनी लाखोल्या वाहिल्या. ‘अफझलखानाची फौज’ अशी हेटाळणीही उद्धव यांनी केली होती. देशात अघोषित हुकूमशाही सुरू असल्याची उपाधीही भाजपच्या कारभाराला दिली होती. पण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोबत युतीची घोषणा करीत शिवसेनेने विरोधकांना टीकेची मोठी संधी तर दिलीच आहे; पण त्याहून अधिक राजकीय विश्वासाहर्ततेवर स्वत:च प्रश्नचिन्ह लावून घेतले. शिवसेनेला आता खुलाशाच्या भूमिकेत जाऊन प्रचाराचा सामना करावा लागेल.

पहले युती, फिर सरकार
अयोध्या दौऱ्यात ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिल्यानंतर आता ‘पहले युती, फिर सरकार’ असा यूटर्नच शिवसेनेने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ भाजपला जसा होईल तसा शिवसेनेला कितपत होईल, याबाबत साशंकता आहे. राज्यात अनेक मतदारसंघांत स्थानिक शिवसैनिक व भाजपमध्ये मतभेदच नव्हे, तर कमालीचे मनभेद झाले आहेत. राजकारणात मतभेद बाजूला सारणे सहज शक्‍य असले, तरी मनभेद कसे बाजूला होतील, हे आव्हान शिवसेना नेत्यांसमोर आहे. शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभांमधून केले. आता कर्जमाफी यशस्वी झाल्याचे पुरावे ते कसे मांडतील, याची उत्सुकता आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचे पालघरमध्ये राजीनामास्त्र
मोखाडा - शिवसेना-भाजप युती झाली असली तरी पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत दोन्ही पक्षांचा निर्णय झालेला नाही. हा मतदारसंघ भाजपकडेच असावा, ही त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका आहे. मात्र भाजप ही जागा शिवसेनेसाठी सोडणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर पालघर जिल्ह्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरू झाले आहे.

या मतदारसंघात १९८४ पासून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तेथून चार वेळा भाजपचा खासदार निवडून गेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com