मुंबई - केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत थेट जनतेतून निवडून यावे, यासाठी भाजपमधून त्यांच्यावर दबाव सुरू आहे. यामुळे रिपाइंचे अध्यक्ष आठवले कमालीचे नाराज झाले असून, भाजपच्या या भूमिकेमुळे आठवलेंना मतदारसंघ शोधण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे सांगितले जाते.
आठवले यांना केंद्रात मंत्री करण्याबाबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यापासून उत्सुक नव्हते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी करून आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाचा मार्ग मोकळा केला होता. यासाठी आठवले यांना अगोदर राज्यसभेवर घेण्यात आले, त्यानंतर त्यांना मंत्री करण्यात आले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत थेट जनतेमधून निवडून येण्यासाठी आठवले यांना सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
युती करताना न विचारल्याने भाजपचे घटक पक्ष असलेले रिपाइं आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम हे नाराज असले तरी भाजपसोबत राहणार आहेत. मात्र २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपची घटक पक्षांसोबत नरमाईची भूमिका राहणार नाही, असे समजते. घटक पक्षांना निव्वळ पोसणे भाजपसाठी बदललेल्या राजकीय वातावरणात फायद्याचे नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येते, त्यामुळे आठवले यांनी थेट जनतेतून निवडून यावे, तरच त्यांना मंत्रिमंडळात सहभागी केले जाईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे आठवले यांनी मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई हा शिवसेनेच्या ताब्यातील लोकसभा मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा, असे आवाहन केले आहे. यापूर्वी आठवले यांनी शिर्डी येथून निवडणूक लढवून पराभव पत्करला आहे.
सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.