Loksabha 2019 :  खदखदीमुळे शिवसेनेची शिस्त धुळीला

Loksabha 2019 :  खदखदीमुळे शिवसेनेची शिस्त धुळीला

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारीवरून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर खदखद पसरली असून, नाराज शिवसैनिकांचे जथ्थे ‘मातोश्री’वर धडकत आहेत. यावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना लावलेली शिस्त धुळीला मिळाल्याचे सध्याचे चित्र आहे.

शिवसेनेची स्थापना झाल्यापासूनच बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असायचा. कोणत्याही निवडणुकीत बाळासाहेबांनी दिलेला उमेदवार पसंत नसला, तरी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याची शिवसैनिकांची परंपरा होती. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतरही ही शिस्त कायम होती. मात्र, सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिस्त धुळीला मिळाल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद मतदारसंघातून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डावलल्याने त्यांचे समर्थक रविवारी (ता. २४) मुंबईत धडकले. मात्र, पोलिसांनी त्यांना ‘मातोश्री’पर्यंत पोचू दिले नाही.  अमरावतीचे खासदार आणि या निवडणुकीत पुन्हा तिकीट दिलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात अनेक शिवसैनिक आज मुंबईत आले होते. मात्र, त्यांच्याही पदरी निराशाच पडली. शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसकडून खासदारकीचे तिकीट मिळवले, मात्र त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी ‘ब्र’ही काढला नाही. एरवी बंडखोरांच्या घरांवर मोर्चे, हल्ले करण्याची शिवसैनिकांची कामाची पद्धत होती. औरंगाबाद, परभणी, यवतमाळ, रामटेक येथेही शिवसैनिकांच्या मनात खदखद असून, ते उघडपणे पक्षाच्या निर्णयावर टीका करीत आहेत.

आयात उमेदवारांमुळे नाराजी
शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवर भाजपातून उमेदवार आयात करून तिकिटे देण्याच्या कृतीवरही शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे. हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या धैर्यशील माने, तर सातारा मतदारसंघातून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील राष्ट्रवादीचे आमदार होते. आता ते भाजपमध्ये आहेत. मात्र, उमेदवारी शिवसेनेची मिळवली आहे. तिकडे भाजपकडून भांडून घेतलेल्या पालघर मतदारसंघातून भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. गावित पूर्वी काँग्रेसमध्ये होते. पोटनिवडणुकीत श्रीनिवास वनगा यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असताना वनगांना आता वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी स्थिती आहे. नरेंद्र पाटील, राजेंद्र गावित व धैर्यशील माने यांचे शिवसेना वाढीसाठी योगदान काय, असा सवाल शिवसैनिक विचारात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com