ज्योतिषी म्हणतात, 'मोदीच असतील पंतप्रधान तर विखे, निंबाळकर, खैरे नक्की जिंकणार!

Vikhe Patil Nimbalkar And Khaire can win the seats of loksabha election estimated of astrologer
Vikhe Patil Nimbalkar And Khaire can win the seats of loksabha election estimated of astrologer

लोकसभा 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, नगरमधून सुजय विखे आणि माढा या बहुचर्चित मतदारसंघातून रणजित निंबाळकर हे विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.

`सरकारनामा फेसबुक लाइव्ह`वर बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला. 2014 ला मोदींना जशी पूर्णतः अनुकूल परिस्थिती होती, तशी या वेळी नाही. तरीही ते सरकार पुन्हा बनवू शकतील. काही ज्योतिषांनी मोदी हे पंतप्रधान होणारच नसल्याचा दावा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले की, माझ्या अभ्यासानुसार मोदी हेच पुन्हा सर्वोच्च पदी बसतील. मोदी यांना निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनुकूलता होती. मात्र एप्रिल आणि मे महिन्यातील ग्रहांची स्थिती पाहता त्यांना सत्ता स्थापन्यासाठी काही अडचणी येतील पण तेच पंतप्रधान होतील. छोट्या पक्षांची भूमिका सरकार स्थापन्यात महत्त्वाची राहील, असे त्यांनी सांगितले.

कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे भविष्याच्या आधारे सांगणे अवघड वाटते. कारण सर्वच पक्षांच्या कुंडलीचा अभ्यास करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीचे किती खासदार निवडून येतील, हे सांगणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केली. राहुल गांधी यांच्या कुंडलीनुसार त्यांचे महत्त्व वाढत जाईल. मात्र ते आता पंतप्रधान होणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची जागांची परिस्थिती सुधारू शकेल, असे दिसते आहे. मात्र किती जागा मिळतील, हे सांगता येत नाही, असे मारटकर म्हणाले. 

सुप्रिया सुळे यांच्यासाठी परिस्थिती पोषक आहे. त्यांना सहज यश मिळणार नसले तरी त्याच बारामतीतून निवडून येतील, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांची पत्रिका चांगली असून ते भविष्यात नेतृत्त्व करतील, असा दावा करत मावळ मतदारसंघात चमत्कारीक, आश्चर्यकारक निकाल लागू शकतो, असे मारटकर यांनी नमूद केले.

मावळमध्ये कोण निवडून आले म्हणजे `आश्चर्यकारक` निकाल लागेल, या प्रतिप्रश्नावर त्यांनी सांगितले की, ही जागा सध्या शिवसेनेच्या बारणेंकडे आहे. त्यांचीही ताकद चांगली असल्याने ते निवडून आले तर आश्चर्यकारक ठरणार नाही. येथे अटितटीची लढत आहे. त्यामुळे पार्थ निवडून आले तर आश्चर्यकारक निकाल म्हणता येईल. पण येथे थेट निकाल सांगणे अवघड आहे.

नगरच्या जागेबद्दल त्यांनी सुजय विखे यांच्या बाजूने अनुकूलता व्यक्त केली. त्यांचे ग्रहमान पोषक असल्याने तेच निवडून येतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. औरंगाबादेत तिरंगी सामन्यामुळे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे धोक्यात असल्याचे बोलले जाते. त्याबद्दल मारटकर यांनी खैरे यांची पत्रिक उत्तम असून तेच निवडून येणार असल्याचा विश्वास मारटकर यांनी व्यक्त केला.

शिरूरमधील अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लढतीत आढळराव बाजी मारणार असल्याचे सांगत त्यांनी कोल्हे यांच्या विजयाविषयी साशंकता व्यक्त केली. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा आढळरावांचे मताधिक्य कमी असेल पण तेच निवडून येणार असल्याचे मारटकरांनी विश्वासाने सांगितले. 

नाशिकमध्ये समीर भुजबळ यांची परिस्थिती बरी आहे. मात्र गोडसे यांचीही पत्रिका उत्तम असल्याने येथे निकाल सांगणे अवघड असल्याचे मत त्यांनी सांगितले.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्यापेक्षा भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांचे पारडे जड आहे. त्यामुळे मारटकर यांनी निंबाळकर हेच निवडून येणार असल्याकडे कौल दिला.

उत्तर मुंबई मतदारसंघातून काॅंग्रेसच्या उर्मिला मातोंडकर जिंकणे अवघड असल्याचे मत त्यांनी मांडले. पुण्यात गिरीश बापट यांची परिस्थिती उत्तम असून त्यांच्या विजयाबद्दल शंका नाही. त्यांना फार संघर्ष करावा लागणार नाही, असेही ते म्हणाले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com