लोकसभा 2019
औरंगाबाद : 'अब्दुल सत्तार हे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनीच माझे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. पक्षाने त्यांना जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मग आता बंडखोरी कशासाठी? यामागे काय राजकारण आहे हे त्यांनीच सांगावे. औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे, पक्षश्रेष्ठींना फोन करून सत्तार यांना उमेदवारी द्या अशी मागणी मी करतो,' अशा शब्दात सत्तारांच्या बंडाला काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांनी प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासह आमदारकीचा राजीनामा दिला. औरंगाबादेतून अपक्ष लोकसभा लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
एवढ्यावर सत्तार थांबले नाहीत, तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आता हायकमांड ऐकत नाही, असे म्हणत त्यांनी रविवारी रात्री उशीरा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाला सूचक इशारा दिल्याचे बोलले जाते.
सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या बंडाच्या पावित्र्यावर औरंगाबाद लोकसभेचे अधिकृत काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला. यावर आपली भूमिका मांडतांना झांबड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा विषय जेव्हा पक्षात सुरू होता, तेव्हा जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांनीच माझे नाव जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने निवडणूक समितीकडे पाठवले होते. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तेव्हा देखील अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, पण तेव्हा 'मै लोकसभा लढा तो सब गणित बिगड जायेगा' असे म्हणत सत्तार यांनी नकार दिला होता. त्यानंतर जेव्हा केव्हा त्यांच्या नावाची पक्षात चर्चा व्हायची तेव्हा त्यांनी मला लोकसभा लढवायची नाही असे स्पष्ट केले होते. औरंगाबादच नाही तर जालना लोकसभा मतदारसंघातून देखील पक्षश्रेष्ठींनी या दोघांना उमेदवारी देऊ केली होती. नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे झालेल्या बैठकीत त्यालाही या दोघांनी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यानंतर जालन्यातून विलास औताडे आणि औरंगाबादेतून माझी उमेदवारी जाहीर झाली. आता मला विश्वासात घेतले नाही असे जर अब्दुल सत्तार सांगत असतील तर ते योग्य नाही.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.