Loksabha 2019 : मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचे झांबड यांच्यासमोर आव्हान 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - गेल्या चार टर्मपासून कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागत असल्याने औरंगाबाद लोकसभेची जागा "राष्ट्रवादी'ला आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून समोर आली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी जोरदार तयारी सुरू केली. खासदार चंद्रकांत खैरेंना रोखायचे असेल तर चव्हाणच हवेत, असे म्हणत अन्य पक्ष, संघटनांनीदेखील मदत करण्याचे धोरण स्वीकारले. मात्र, मतदारसंघ सोडायला तयार नसलेल्या कॉंग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी बहाल केली. यामुळे राष्ट्रवादीच्या युवक मंडळींकडून ही "कॉंग्रेस आणि शिवसेनेची मैत्री' तर नाही ना, अशा शब्दांत टीका केली आहे. 

गेल्या चार लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. त्यामुळे यंदा ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी सोडावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेससमोर ठेवला. विशेष म्हणजे या मतदारसंघांत मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता खासदार खैरेंना रोखायचे असेल तर मराठाच उमेदवार हवा, अशी मागणी कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून केली गेली.

चव्हाणांना तयारीला लागा, असे संकेत मिळाल्याने त्यांनी गेल्या तीन-चार महिन्यांत सभा, बैठकांवर भर देत भेटीगाठी सुरू केल्या. भावी खासदार म्हणून सोशल मीडियावर त्यांच्याच नावाची चर्चाही रंगायला लागली होती. मात्र, जागा सोडण्यास कॉंग्रेस तयार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी "पुढे बघू' म्हणत चार दिवसांपासून कार्यालयातच थांबणे पसंत केले. दरम्यान, शुक्रवारी (ता. 22) मध्यरात्री कॉंग्रेसने आमदार झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून सोशल मीडियातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर शंका घेत टीका करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे स्वपक्षीय (कॉंग्रेस), राष्ट्रवादीसह मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचे झांबड यांच्यासमोर आव्हान आहे. विशेष म्हणजे आमदार झांबड यांच्या उमेदवारीवरून खुद्द कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनीच बंड पुकारले आहे. त्यामुळे अजून पुढे काय-काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
  
चव्हाणांकडून पक्षाचे आभार 
गेल्या तीन-चार महिन्यांत या मतदारसंघात परिपूर्ण तयारी केली होती. मात्र, जिल्हा कॉंग्रेसमधील काही व्यक्‍तींनी हा मतदारसंघ जिंकण्यापेक्षा स्वहिताआड कोणी येऊ नये, यासाठी अधिक तत्परता दाखविली आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याइतपत मी सक्षम आहे, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटणे, हीच माझ्यासाठी मनस्वी आनंदाची गोष्ट आहे, असे म्हणत चव्हाण यांनी पक्षासह विश्‍वास दाखविणाऱ्या जनतेचे आभार व्यक्‍त केले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्री. चव्हाण यांनी म्हटले, की जिल्हा कॉंग्रेसमधील काही व्यक्‍तींवर "अंगाऱ्याची जादू' चालते. परिणामी जागा गमवावी लागते. पक्षाने माझ्यावर विश्‍वास व्यक्‍त केला होता. त्याबद्दल पक्षातील नेत्यांसह जनतेचे आभार मानतो.  दरम्यान, उमेदवारीबाबत आपली भूमिका उद्या (ता. 24) पत्रकार परिषदेत जाहीर करु, असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. 
1999 (पासून आजतागायत) : चंद्रकांत खैरे (शिवसेना) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com