परभणी - गैरव्यवहारांवर गैरव्यवहार करून राष्ट्र देशोधडीला लावण्याचे पाप कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहे. 56 पक्ष एकत्र आले काय आणि तुमच्या 56 पिढ्या लढल्या तरी परभणीवरचा भगवा कधीही खाली उतरणार नाही, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. 15) केला. भगवे वादळ दिल्लीचे तख्त काबीज करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 15) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. सभा सुरू होण्यापूर्वी जोरदार वादळी वारे सुरू झाले होते. हाच धागा पकडून ठाकरे म्हणाले, ""मी राज्यभर वादळ घेऊन फिरत आहे. सोबत कोणी असो की नसो, हे वादळ माझ्यासोबत फिरत आहे. भगव्याचे हे वादळ दिल्लीचे तख्त काबीज करणार आहे.''
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढले. त्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, 'हा मर्दांचा हिंदुस्थान आहे. ही इटली नाही. जो या देशातील क्रांतिकारकांचा अपमान करेल, त्याच्या स्वप्नाचा चुराडा केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाहीत. देशात मोदींची लाट पाहून शरद पवार यांनी निवडणुकीतून पळ काढला. आता त्यांचे खासदार दिल्लीला जाऊन काय करणार? तेही पळपुटे असणार.''
|