लोकसभा 2019
नगर : डाॅ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी व त्यांच्या गटाची नाराजी असणे स्वाभाविकच आहे. विशेषतः श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्यांत भाजपचा गांधी गट सक्रीय आहे.
या गटाकडून पक्षाचे काम होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळेच हे नेटवर्क अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण जगताप यांना मिळणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी लढविणार की काॅंग्रेसला सोडणार, याबाबत खलबते सुरू होते. काॅंग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी ही जागा काॅंग्रेसला हवी होती. त्याबाबत मोठा काथ्याकुट होऊन अखेर राष्ट्रवादीने जागा सोडलीच नाही. परिणामी डाॅ. विखे भाजपमध्ये गेले. तेथे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचाही पत्ता कट झाला. गांधी यांनी दिल्लीपातळीवरून उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, परंतु त्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे त्यांचे नेटवर्क असलेला गट, अल्पसंख्यांक जैन समाज तसेच इतर समाजाची त्यांची हक्काची मते साहजिकच जगताप यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
श्रीगोंदे तालुका हा जगताप कुटुंबियांची मायभूमी आहे. तसेच त्यांचा या भागात चांगला संपर्कही आहे. पाथर्डीत तर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल `बरे झाले पीडा गेली` अशाच घोषणा देवून विखे यांचे भाजप प्रवेशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे जगताप यांना ही जमेची बाजू होऊ शकेल. तसेच कर्जतमधील काही पदाधिकाऱ्यांनी कालच डाॅ. सुजय विखे यांच्यासोबत हाती कमळ घेतले आहे. परंतु काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा श्रीगोंदे-कर्जत येथील गट मात्र चांगला सक्रीय आहे. थोरात व विखे यांचे राजकीय मतभेद सर्वश्रूत असल्याने थोरातांचा हा गट आघाडीचे काम मन लावून करेल, अर्थात जगताप यांना ही जमेची बाजू मानली जाते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.