Loksabha 2019 : दोस्त दोस्त ना रहा....! 

Loksabha 2019 : दोस्त दोस्त ना रहा....! 

इस्लामपूर - जयंत विरोध हा समान धागा जुळवून शेट्टींनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा आणि वाळवा तालुक्‍यात गेली दहा वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कट्टी केली होती. मात्र आता तेच खासदार शेट्टी आता जयंतरावांशी गट्टी करून तिसऱ्यांदा लोकसभेत जायच्या इराद्याने बाहेर पडले आहेत. त्यामुळे इतकी वर्षे त्यांना साथसोबत करणाऱ्या पारंपरिक जयंतविरोधकांची आता दोस्त दोस्त ना रहा... अशी भावना झाली असून आता ते पुुढची वाटचाल कशी करतात याबाबत दोन तालुक्‍यात कुतूहल आहे. 

एखादी माळ तुटून त्यातील मणी रानोमाळ विखुरले जावे तसे वाळवा-शिराळा तालुक्‍यातील जयंत पाटील विरोधक प्रत्येक निवडणूकीनंतर विखुरले जातात. त्यांना गेल्या दहा वर्षात एकत्रित करुन तगडे आव्हान उभे करण्यात शेट्टींचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच शेट्टींना जयंत पाटील विरोधकांचे व्यवस्थापक म्हटले जाते. कितीही ताणले तरी विरोधकांना एकत्रित करुन आव्हान उभे करण्याची किमया शेट्टींनी गेल्या दहा वर्षात साधली होती. वाळवा-शिराळा तालुक्‍यातील जयंत विरोधकांचे व्यवस्थापक अशी खासदार शेट्टी ओळख तयार झाली आहे.

खरे तर ते शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍याचे मात्र त्यांनी इथे जयंत विरोधाच्या मुद्दयावर रान उठवत सर्व विरोधकांची मोट बांधली. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक गट, नायकवडींचा हुतात्मा गट, शिवसेनेचे आनंदराव पवार, आणि आता नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह कॉंग्रेसमधील अनेक गट आणि त्यांचे नेते यांची मोट शेट्टींनी बांधली. एरवी प्रत्येकाला खिंडीत गाठून धूळ चारणाऱ्या जयंतरावांना शेट्टी मात्र नाकी नऊ आणले. मात्र आता यु टर्न घेत शेट्टींनी राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे.

ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार निवेदिता माने यांना पराभूत करून शेट्टींनी दिल्ली गाठली त्याच राष्ट्रवादीसोबत आता त्यांची आघाडी आहे. तर निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील यांच्याशी त्यांचा थेट सामना असेल. मात्र इस्लामपूर-शिराळा तालुक्‍यातील त्यांच्या मैतरांचे भूमिका आता काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या दहा वर्षात ज्यांच्या खांद्यावर विश्‍वासाने जयंत पाटील विरोधकांनी मान ठेवून राजकारणातील प्रत्येक निर्णय घेतला ते राजू शेट्टीच आता जयंत पाटलांचे मित्र झाले आहेत.

"दोस्त दोस्त ना रहा ' असे म्हणायची वेळ आता जयंत विरोधकांवर आली आहे. ते शेट्टींच्या विरोधी उमेदवाराला मदत करणार की भविष्यातील सोयीच्या राजकारणासाठी तटस्थ राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिराळा तालुक्‍यात शिवाजीराव नाईक यांचा गट म्हणजेच शेट्टींचा गट असे समीकरण आहे. हुतात्मा गटाने राजू शेट्टींच्या ऊस दर आंदोलनाला मदत म्हणून एकदा राज्यात प्रथम दर घोषित करत कोंडी फोडली होती. महाडिकांनी तर प्रत्येक वेळी शेट्टींना आपल्या प्रत्येक निर्णयात समाविष्ट केले होते.

शिवसेनेचे आनंदराव पवार यांची भेट घेतल्याशिवाय शेट्टींनी महिना उलटून दिला नाही. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना निवडून आणण्यासाठी शेट्टींनी इस्लामपूर नगरपालिकेत विस्कटलेली विकास आघाडी पुन्हा बांधली. कॉंग्रेसच्या प्रत्येक गटाला आपल्या सोयीने मदत करणे शेट्टींनी कर्तव्य मानले.

कामेरीचे सी. बी.पाटील, इस्लामपूरचे वैभव पवार, बोरगावचे जितेंद्र पाटील यांनी आजवर शेट्टींसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीधर्मही खुंटीवर टांगून ठेवला आहे. आता मात्र आता शेट्टीच जयंतमय झाल्याने विरोधकांच्या भुमिकेविषयी उत्सुकता ताणली आहे. प्रचाराचे मैदान तापू लागले ही सर्वांचे पत्ते उघड होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com