Loksabha 2019: ...तर सांगलीत तगडा उमेदवार देऊ

Loksabha 2019: ...तर सांगलीत तगडा उमेदवार देऊ

जयसिंगपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटना वर्धा मतदार संघासाठी आग्रही आहे, मात्र सांगली मतदारसंघ मिळाला तरी आमची हरकत नसेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.  

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे. राष्ट्रवादीने हातकणंगले सोडला आहे. आता काँग्रेसने एक जागा सोडायची आहे. आमचा आग्रह वर्धा आहे.  त्यांनी दोन्हीपैकी एक जागा  सोडली जाईल, असा निरोप पाठवला आहे. सांगली मिळाला तरी आमची तयारी आहे. या  ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीचा उमेदवार देऊ.’’

ते म्हणाले, ‘‘इंद्रजित देशमुख यांच्या नावावर चर्चा आहे, गोपीचंद पडळकर यांच्याशीही मी नेहमीच बोलत असतो. परंतु, भाजपचा तेथे कोण उमेदवार असेल,  यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. खासदार संजय पाटील उमेदवार असतील तर स्वाभिमानी आणखी वेगळा विचार करेल.’’

शेट्टी, आवाडे व विश्‍वजित यांच्यात जयसिंगपुरात बैठक

जयसिंगपूर - अंतर्गत गटबाजीमुळे निर्माण झालेला सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी जयसिंगपूरमध्ये खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि भारती विद्यापीठाचे अध्यक्ष, आमदार विश्‍वजित कदम यांच्यात आज तासभर चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील मिळू शकला नाही. खासदार शेट्टी यांच्या येथील संपर्क कार्यालयात दुपारी बंद खोलीत ही चर्चा झाली.

‘स्वाभिमानी’ने सुरवातीला हातकणंगले, बुलढाणा आणि वर्ध्याची जागा मागितली होती. यावरून दीर्घकाळ ताणाताणी झाल्यानंतर ‘राष्ट्रवादी’ने बुलढाण्यात राजेंद्र शिंगणे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने ‘स्वाभिमानी’ला माघार घ्यावी लागली. यानंतर मात्र ‘स्वाभिमानी’ने अकोला आणि वर्ध्याच्या जागेवर दावा केला. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींनी सांगलीच्या जागेचा प्रस्ताव ‘स्वाभिमानी’पुढे ठेवला.

सांगलीत पक्षांतर्गत दोन गटांत वादाला तोंड फुटले. सांगली लढविण्याची ‘स्वाभिमानी’ने तयारी दर्शविल्याने ही जागा ‘स्वाभिमानी’च्या वाट्याला जाण्याची शक्‍यता गृहीत धरून वादाला सुरवात झाली. ही कोंडी फोडण्यासाठी खासदार शेट्टी यांच्या संपर्क कार्यालयात तासभर चर्चा झाली. काँग्रेसने सांगलीची जागा दिली तरी लढण्याची तयारी खासदार शेट्टी यांनी दर्शविल्याचे समजते. विश्‍वजित कदम आणि आवाडे यांच्यातील चर्चेतून हा प्रश्‍न सोडविण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

चर्चा सकारात्मक?
बैठकीत ठोस तोडगा निघाला नसला तरी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. ‘स्वाभिमानी’च्या निर्णयामुळे सांगली काँग्रेसमधील दोन गटांतील वाद उफाळला असून, स्वाभिमानी आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठीच यातून मार्ग काढू शकतात. खासदार शेट्टी, आवाडे आणि विश्‍वजित कदम यांच्या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघावरही चर्चा झाल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com