Loksabha 2019 : वर्चस्व राखण्याचे युतीपुढे आव्हान

Parth and Shrirang
Parth and Shrirang

पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकतेची मूठ; पुनरावृत्तीसाठी युती उत्सुक
वडगाव मावळ - गेल्या दोन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. प्रत्येक वेळी तिसऱ्या पर्यायामुळे आघाडीच्या मतांमध्ये झालेली फूटही या वर्चस्वासाठी पोषक ठरली आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पवार घराण्यातील उमेदवारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व गटातटांसह मित्र पक्षांनी एकजुटीने केलेले काम व राबविलेली प्रचार मोहीम यामुळे महायुतीचे वर्चस्व कायम राहणार का? याबाबत औत्सुक्‍य आहे.

मावळ तालुक्‍यात महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार व महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचाच खऱ्या अर्थाने बोलबाला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थसाठी तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे सर्व गट-तट, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांची मोट बांधून प्रचारात सक्रिय केले. बारणे यांची भिस्त भाजपच्या संघटनेवर अवलंबून होती. भाजप व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच बारणे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

२००९ चे गणित
विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत भाजपचे बाळा भेगडे ४५.२९ टक्के मते घेऊन विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे बापूसाहेब भेगडे यांना ३७.४९ टक्के मते मिळाली होती. तिसऱ्या स्थानावर एकत्रित आरपीआयचे रमेश साळवे होते. त्यांना ८.२५ टक्के मते मिळाली होती. उर्वरित सहा जणांना मिळून ४.३२ टक्के मते होती. त्यात मनसे, बहुजन समाज पार्टी यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मनसे महाआघाडीकडे होते. त्यांच्या मतांची बेरीज केल्यास ५०.३७ टक्के होते. ती भाजपपेक्षा पाच टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र. त्या वेळच्या एकत्रित आरपीआयची आता दोन गटांत विभागणी झाली आहे. साळवे यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीकडे, तर आठवले यांचा आरपीआय पक्ष महायुतीकडे आहे. त्यामुळे दोघांचे पारडे समसमान होते.

२०१४ चे गणित
भाजपने २०१४ च्या निवडणुकीतही बाळा भेगडे यांनाच उमेदवारी दिली होती. त्यांनी ४५.७६ टक्के मते घेऊन पुन्हा विजय मिळवला. या वेळी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व मनसे अशी पंचरंगी लढत होती. राष्ट्रवादीचे माऊली दाभाडे ३२.३२ मते टक्के मिळवून दुसऱ्या स्थानावर होते. काँग्रेसचे किरण गायकवाड ८.४६, शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे ८.३४ व मनसेचे मंगेश वाळुंज यांना १.८ टक्के मते मिळाली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआयची महायुती आहे. त्यांच्या मतांची बेरीज ५४.११ टक्के होते. महाआघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मनसे आहेत. त्यांच्या मतांची टक्केवारी ४२.६० टक्केच होते. ती महायुतीपेक्षा ११.५१ टक्‍क्‍यांनी कमी आहे. यामुळे दोन्ही विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच वर्चस्व राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com