पुणे - आपला उमेदवार अनिल शिरोळे की अन्य कोणी, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, यासाठी ही निवडणूक आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी काय केले हे घरोघरी जाऊन सांगा, असे आवाहन भाजपचे केंद्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले.
आनंद देवधरलिखीत "राष्ट्रप्रथन-नमो सर्वोत्तम' या पुस्तकाचे प्रकाशन देवधर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, चंद्रकला प्रकाशनच्या शशिकला उपाध्ये या वेळी उपस्थित होत्या.
मोदींनी पाच वर्षांत एकही दिवस सुटी न घेता काम केले, सामान्यांसाठी मुद्रा बॅंक, आयुष्यमान भारत, उज्वल गॅस योजना, जन-धन योजना यासह अनेक योजना आणल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, असे म्हणत त्यांनी काम केले; पण विरोधक आतताईपणा करत खोटा प्रचार करत आहेत. या खोट्या प्राचाराच्या जाळ्यात जनता अडकणार नाही. गेल्या दहा वर्षांत पडलेले खड्डे पाच वर्षांत बुजविले आहेत, आता पुढे त्यावर नवीन भारत उभा रहाणार आहे, असे सांगत देवधर यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
त्रिपुराचे उमेदवार निश्चित, पण पुण्याचे काय?
काल रात्री सेंट्रल इलेक्शन कमिटीची बैठक झाली, त्यात सर्वप्रथम त्रिपुराचे दोन उमेदवार निश्चित झाले, असे देवधर यांनी सांगितले. या वेळी पुण्यातील तिन्ही इच्छुक उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा रंगलेली असताना देवधर यांच्या माहितीमुळे पुण्यासाठीची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.
|