Loksabha 2019 : जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग

Politics
Politics

उमेदवारांची नावे आठवडाभरात होणार जाहीर
पुणे - लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या तारखा जाहीर होताच पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे येत्या आठ दिवसांत जाहीर होतील. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये आत्तापासूनच पक्षांतर्गत खलबते सुरू झाली आहेत. परिणामी, निवडणूक ज्वर निर्माण होऊ लागला आहे.

पुण्यासह जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात भाजपचा एक, शिवसेनेचे दोन तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक खासदार आहे. पुण्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारीसाठी पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून आता काकडे, प्रवीण गायकवाड आणि मोहन जोशी यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी (ता. 11) दिल्लीत बैठक होणार असून, त्यात पुण्याच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल का ? याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तर, भाजपचा उमेदवार येत्या आठ दिवसांत निश्‍चित होईल, असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्‍चित आहे. मात्र, बारामतीसाठी सक्षम उमेदवार देण्याची भाजपची धडपड सुरू आहे. त्यातून अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तर, मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनाच रिंगणात उतरविले जाण्याची शक्‍यता आहे. तसेच जागावाटपात शिवसेनेकडील मावळ लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात यंदा काहीही झाले तरी विजय मिळवायचा, असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. त्यासाठी शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षात आणून निवडणुकीच्या तयारीला राष्ट्रवादीने प्रारंभ केला आहे. डॉ. कोल्हे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी अटकळ आहे. बारामती, मावळ आणि शिरूरमधील चित्र येत्या आठवडाभरात स्पष्ट होईल.

प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार ?
सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी निश्‍चित झाल्यावर इच्छुकांना सुमारे 30-35 दिवस प्रचारासाठी मिळतील. मात्र, काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळणार का, याकडे इच्छूक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com