पुणे - पक्षाचा राजीनामा देणाऱ्या व स्वार्थासाठी वेगळी चूल मांडणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कृतीचा निषेध करून त्यांना कायमचे पक्षाबाहेर पाठवावे, असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) बैठकीत रविवारी करण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे हनुमंत साठे, श्रमिक आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामे देऊन पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर, शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. तीत हा ठराव करण्यात आला. या बैठकीला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, आयुब शेख, अशोक शिरोळे, नीलेश आल्हाट, मंदार जोशी, महिपाल वाघमारे, संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर आदी उपस्थित होते.
डॉ. धेंडे म्हणाले, 'रामदास आठवले पक्षासाठी जो निर्णय घेतील; त्याचे पालन करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायला हवे. पक्षातून बाहेर पडून विरोधात काम करणे योग्य नाही. पक्षाने आजवर या नेत्यांना खूप काही दिले. मात्र, त्यांच्या अपेक्षा वाढत आहेत. आठवले यांचे नाव पुढे करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना पुन्हा पक्षात घेऊ नये.''
|