हवा विरळ असली, तरी मोदींचीच

हवा विरळ असली, तरी मोदींचीच

असे म्हटले जाते, की सन २०१९ मध्ये २०१४ चा गुजरात नसेल, हे २०१७ ने दाखवून दिले. याचा अर्थ असा, की २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता कमी आहे. त्या निवडणुकीत भाजपला या राज्यात २६ पैकी २६ जागा मिळाल्या होत्या. आगामी लोकसभेत तसे घडण्याची शक्‍यता फारच कमी आहे. याचे कारण म्हणून राजकीय अभ्यासक आणि चर्चा गेल्या विधानसभेतील भाजपच्या आणि काँग्रेसच्या कामगिरीकडे बोट दाखवतात.

भारतीय राजकीय गणितात कोणताही स्थिरांक नसतो, हे दाखविणारी ती निवडणूक. तिने काँग्रेसमध्ये टवटवी आणली. राहुल गांधी यांना सर्वाधिक फायदा मिळवून दिला. त्यांचा प्रतिमाबदल केला. त्यात विजय भाजपचा झाला. परंतु, विधानसभेच्या १८२ पैकी केवळ ९९ जागा मिळणे आणि काँग्रेसला मात्र ७७ जागी यश प्राप्त होणे हा मोदी-शहांसाठी धक्काच होता. गेल्या लोकसभेत या राज्याने भाजपच्या पारड्यात ५९ टक्के मते टाकली होती. ती टक्केवारी अवघ्या तीन वर्षांत ४९ वर आली. त्याची कारणे अनेक होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुजरात मॉडेलचे उडालेले पोपडे. ‘विकास गांडो थयो छे’ हे घोषवाक्‍य त्यातूनच आले. दुसरे कारण म्हणजे शेतकरी-कष्टकरी यांच्यातील नाराजी. त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छमधील ५४ ग्रामीण मतदारसंघांपैकी ३० जागा काँग्रेसला मिळाल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळाले.

एकीकडे ही पार्श्वभूमी आणि दुसरीकडे भाजपमधील गटबाजी, सरकारमधील भ्रष्टाचार, वास्तव आणि प्रचार यांतील फरक, हे सारे समोर येत आहे. पुरुषोत्तम सोळंकी या वजनदार भाजप मंत्र्यावर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच ४५० कोटी रुपयांच्या मत्स्योद्योग घोटाळ्यात ठपका ठेवलाय. चार हजार कोटींचा भुईमूग खरेदी घोटाळा सध्या गाजतोय. बेरोजगारी ही मोठी समस्या. गेल्या जानेवारीत व्हायब्रंट गुजरातची जागतिक परिषद झाली. त्यात २८ हजार ३६० ‘एमओयूं’वर सह्या झाल्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितले. गुंतवणूक किती होणार, हे गुलदस्तातच ठेवले. एकूणच व्हायब्रंट गुजरातने तेथील रोजगार स्थितीत फारशी व्हायब्रंन्सी आणली नसल्याचा आरोप आहे. शेतकरीवर्ग तर नाराज आहेच, पण परकी गुंतवणूक, नोटाबंदी आणि जीएसटीने पोळलेला व्यापारीवर्गही फार खूश नाही. अशा स्थितीत भाजपला आगामी निवडणूक अवघड जाईल, असे कोणीही म्हणेल.

येथे हे विसरता मात्र कामा नये, की भाजपविरोधातील नाराजी मतांमध्ये फारशी उतरलेली नाही. विधानसभेत शहरांतील ५५ पैकी ४३ मतदारासंघ भाजपने जिंकले. पाटीदारांचे प्राबल्य असलेल्या उत्तर गुजरातेतही ३२ पैकी १४ जागा भाजपने मिळविल्या. ही विधानसभेची स्थिती. लोकसभेत याहून अधिक चांगली स्थिती असू शकेल. याचे कारण तेथे नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा आणि पुनरागमन पणाला लागलेले असेल. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये फिरलेली हवा पाहून मोदींनी पाकिस्तान आणि जात या दोन बाबी प्रचारात उतरवल्या होत्या. ती ब्रह्मास्त्रे अजून कायम आहेत. पुलवामा हल्ल्याने त्यातील पाकिस्तान हा मुद्दा तर अधिकच टोकदार झालेला आहे. विकास आणि भ्रष्टाचार हे मुद्दे प्रचारात असले, तरी ते मतदानात चालत नाहीत, हे तर सिद्ध झालेले आहे. तेव्हा गुजरातमध्ये विधानसभेतील यशापयश पाहून लोकसभेचा अंदाज बांधण्यात अर्थ नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com