Loksabha 2019 : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर ठरविणार राजकीय भूमिका : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna-Vikhe-patil.jpg
Radhakrishna-Vikhe-patil.jpg

नगर : ''लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील राजकीय दिशा ठरविणार आहोत. तूर्त पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी दिवंगत वडील बाळासाहेब विखे पाटील यांचे अधुरे राहिलेले काम व स्वप्न सरकारच्या मदतीने पूर्ण करण्याचे ध्येय समोर असल्याची भूमिका'' राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर मांडली. 

नगर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी राष्ट्रवादी तयार नाही. तथापि, डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी मिळेल. मात्र, ती राष्ट्रवादीच्या चिन्हावर असेल. तुम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढा, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनीच दिला. हा सल्लाच माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होता, असे ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची मानसिकता देखील केली. मात्र, त्याच वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर टीका केली. डॉ. सुजय यांना पराभूत करू, अशी मुक्ताफळे उधळली. हा सर्वच घटनाक्रम अत्यंत वेदनादायी होता, असे म्हणाले. 

ते म्हणाले, "साडेचार वर्षांत शेतकऱ्यांचे प्रश्‍न, पक्षाची संघर्ष यात्रा, आक्रोश यात्रा आयोजित केली. सभागृहातही भूमिका मांडली. जे-जे महत्त्वाचे प्रश्‍न होते, त्या प्रश्‍नांना वाचा फोडली. विरोधी पक्षनेते म्हणून प्रामाणिक काम केले. त्यातही विरोधी पक्षनेता म्हणून एकही भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर झाला नाही. त्यातून पक्षाची व स्वत:ची प्रतिमादेखील स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एवढे सर्व होऊनही पक्ष नेतृत्वाने पाठबळ दिले नाही, याचे दु:ख मनात आहे.'' 

राज्यातील 40 जागांविषयी चर्चा संपल्यानंतर नगरसह आठ जागांवर वादंग सुरू होते. त्यावेळी नगरची जागा काँग्रेसला सोडण्यासंदर्भात मी आग्रह धरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार येथून मागील तीन निवडणुकांत पराभूत झाल्याने या वेळी काँग्रेसला जागा सोडावी, अशी भूमिकाही मांडली. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मी स्वत: भेट घेतली. मात्र, आमच्याच पक्षातील काही मंडळींनी ही जागा काँग्रेसला मिळू नये, यासाठी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट विखे पाटील यांनी केला. 

विखे पाटील म्हणाले, "सुजयच्या उमेदवारीसाठी माझा आग्रह होता. त्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही भेटलो. मात्र, त्या भेटीतील घटनाक्रम माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होता. दिल्लीत झालेल्या या भेटीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे माझ्यासोबत होते. पक्ष नेतृत्वाने ही जागा तुम्ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून व त्यांच्याच चिन्हावर लढा, असा सल्ला मला दिला. माझ्यासाठी ही घटना वेदनादायी होती. मात्र, तशाही स्थितीत निवडणूक लढविण्याची मानसिकता केली. अशा वेळी पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर पुन्हा मुक्ताफळे उधळली. ती अत्यंत क्‍लेशदायी होती. ती सहन न झाल्याने त्याच वेळी डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. साडेचार वर्षांत केलेल्या कामाचे काय फलित मिळाले, असाही विचार त्या वेळी मी केला. मात्र, तशाही स्थितीत 15 मार्चला पक्षश्रेष्ठींना कल्पना देऊन डॉ. सुजय यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यासोबत मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचे पत्रही दिले होते. सुजय भाजपमध्ये गेल्याने आता मी विरोधी पक्षनेतेपदावर राहणे उचित नसल्याचे श्रेष्ठींना कळविले होते. मात्र, त्या वेळी माझा राजीनामा प्रलंबित ठेवला.'' 

''नगर लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याची भूमिका त्या वेळी मी जाहीर केली होती. मात्र, सर्वच राजकीय प्रचार व्यक्तिगत पातळीवर आणून ठेवल्याने माझ्यापुढे पर्याय शिल्लक राहिला नाही. थेट माझ्या भाऊबंदकीचेदेखील राजकारण करण्यात आले. विरोधकांच्या सर्वच राजकीय भूमिका पूर्वग्रहदूषित झाल्या. पवार विरुद्ध विखे, असेच स्वरूप त्यास दिले गेले. त्यात पक्ष माझ्यामागे उभा राहिला नाही, याचेही शल्य होते. म्हणून व्यक्‍तिगत पातळीवर सुजयचा प्रचार केला.'' 

काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक असूनही राज्यात अन्यत्र कुठेच प्रचारसभा घेतल्या नसल्याबद्दल ते म्हणाले, ""नगरमध्ये प्रचार करताना वेगळे चित्र होते. त्याबाबत राज्यात अन्य मतदारसंघांत चुकीचा मेसेज जाऊ नये, म्हणून मुद्दामच राज्यात अन्य कुठेही पक्षासाठी प्रचारसभा घेतल्या नाहीत. त्यातही काही झाले तर विखेंचीच चूक असल्याचे दाखविण्यात येत होते. राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची सर्वांशी मैत्री चालते. मात्र केवळ माझी बदनामी करण्यासाठीच मी मुख्यमंत्र्यांचा मित्र असल्याचे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला गेला.'' 

भविष्यात पाणीप्रश्‍नावर मोठा संघर्ष करण्याची मानसिकता आहे. त्यातही पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी नगर, नाशिक, मराठवाडा व खान्देशसाठी महत्त्वाचे असून, हाच महत्त्वाचा विषय पुढील राजकीय अजेंड्यावर असेल. त्यात नगरसाठी महत्त्वाचा असलेला 'कुकडी' व 'घोड'च्या पाण्याचा स्थानिक विषयदेखील सोडण्यासाठीच पुढील लढाई असेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. 

पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविण्याचा प्रस्ताव समोर आला. त्या वेळी हे खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. त्या वेळीदेखील पाण्याचा हा प्रश्‍न मार्गी लागल्यास त्याचे श्रेय दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांना मिळेल, अशी स्थिती निर्माण झाल्याने जाणीवपूर्वक या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला. पाण्याचा प्रश्‍न सुटला तर शेती आणि त्यासोबत बेरोजगारीचे प्रश्‍नही कमी होतील, असे ते म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com