काँग्रेसचा पाया घट्ट करणारा खासदार....

काँग्रेसचा पाया घट्ट करणारा खासदार....

१९७१ चा काळ काँग्रेस आणि विशेषतः इंदिरा गांधी यांच्या प्रभावाचा होता. हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी हा सारा परिसर दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या ताब्यात होता; पण मोठ्या गटबाजीचाही त्याला शाप होता. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला, विरोधी उमेदवाराला तोंड देण्यापेक्षा स्वपक्षातील गटबाजीला तोंड देणे खूप अडचणीचे होते. रत्नाप्पा कुंभार, सा. रे. पाटील, कल्लाप्पा आवाडे, बाळासाहेब माने ही सारी मोठी माणसे काँग्रेसमध्ये होती; पण कधीही एका व्यासपीठावर येण्याची शक्‍यता नव्हती. 

अशा परिस्थितीत दत्ताजीराव कदम या सहकारात काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली. दत्ताजीराव कदम हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. सहकारातील काम सर्वांना बरोबर घेणारे; पण राजकारणात थोडे कमी. त्यांना उमेदवारी मिळाली खरी; पण त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाने त्र्यंबक सीताराम कारखानीस यांच्यासारखा तगडा उमेदवार जाहीर केला. कारखानीस म्हणजे ज्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या विरोधकांनीही शंका घेतली नाही. अशा परिस्थितीत दत्ताजीराव कदम यांनी पक्षाचा आदेश मानून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.

त्यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिरोळ, खिद्रापूरपासून कोकणात वैभववाडीपर्यंत पसरलेला. त्यामुळे प्रत्यक्ष गावागावात जाऊन प्रचार करणे अशक्‍य होते. 
उमेदवाराच्या नावावर व त्यापेक्षाही पक्षाच्या चिन्हावरच मतदान अवलंबून होते. या निवडणुकीत रत्नाप्पा कुंभार, सा. रे. पाटील हे कदमांना कितपत मदत करतील ही शंका होती. 
पण दत्ताजीराव कदम यांनी या निवडणुकीत प्रयत्नांची शर्थ केली. इचलकरंजीपुरत्या मर्यादित असलेल्या कदमांनी वैभववाडीपर्यंत माणसे जोडली व या निवडणुकीत तब्बल दोन लाख २७ हजार ३६३ मते मिळवून बाजी मारली.

कारखानीस यांना एक लाख ४२ हजार ३७२ मते मिळाली. आ. ह. चिगरे या अपक्ष उमेदवाराला ३ हजार ४०६ मते मिळाली. दत्ताजीराव कदम यांच्या या विजयाने जिल्ह्यातील काँग्रेसला खऱ्या अर्थाने उभारी आली. त्यांच्याच कारकीर्दीत काँग्रेस कमिटीची इमारत उभी राहिली. अनंतराव भिडे यांच्यासारख्याकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद आले. 

दत्ताजीराव कदम यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे नेतृत्व मानले. राजकीय घडामोडीतून चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले. कदमांसारख्या कार्यकर्त्याची आपण कोणत्या गटात जावे यावरून द्विधा मनःस्थिती झाली. त्यांना दोन्ही नेते आदराचे; पण गटबाजीत कोणा एका गटाची बाजू घेणे त्यांना पटत नव्हते. अशा परिस्थितीत १९७७ ची पुढची निवडणूक आली.

अर्थातच दत्ताजीराव कदम यांचे नाव जवळजवळ निश्‍चित झाले; पण यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या वादात आपल्याला उमेदवारी नको, अशी भूमिका घेत कदम यांनी उमेदवारी नाकारली. चव्हाण व वसंतदादा पाटील या दोघांनीही त्यांना राजकीय वाटचालीत मदत केली होती. त्यामुळे दोघांनाही दुखवायचे नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्यासारखा मनाचा मोठेपणा नंतर काळाच्या ओघात बाजूला पडला आणि दत्ताजीराव कदम हा चेहराही राजकारणातून बाजूला पडत गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com