LokSabha 2019 : भाजप खासदार समर्थकांचा जीव टांगणीला

LokSabha 2019 : भाजप खासदार समर्थकांचा जीव टांगणीला

भिवंडी - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर भिवंडीत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कामाला सुरुवात केली आहे. भाजप, मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

शिवसेनेने भाजपच्या उमेदवारीस विरोध दर्शविल्यामुळे युतीत द्विधा परिस्थिती आहे. मात्र, भाजपच्यावतीने खासदार कपिल पाटील यांचे नाव निश्‍चित असले तरी अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे, तर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात सध्या प्रबळ उमेदवार मिळत नसल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत.  गत निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे पाटील निवडून आले; परंतु काही प्रमाणात परिस्थिती बदलली आहे. 

भाजपविरोधी वातावरणाचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. काँग्रेसमधून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. खासदार पाटील यांना शह देण्यासाठी शिवसेनेतील काही पदाधिकारी, तसेच सेनेचे माजी आमदारसुद्धा भिवंडी लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्ली व मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या दारात इच्छुक फेऱ्या मारत आहेत. काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे, कुणबी सेनाप्रमुख विश्‍वनाथ पाटील, प्रदेश सचिव प्रदीप राका, सरचिटणीस तारीक फारूकी, माजी आमदार योगेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते  जव्वाद चिखलेकर यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. 

मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना सबुरीचा सल्ला देत सक्षम उमेदवारांचा शोध भिवंडी मतदारसंघात सुरू केल्याने इच्छुकांसह पदाधिकारी नाराज झाले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून खासदार कपिल पाटील यांनी मेट्रो, उड्डाणपूल व एमएमआरडीएच्या सहकार्याने सिमेंट काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा योजना निर्माण केल्या आहेत. तसेच मतदारसंघात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद गट ताब्यात घेऊन पक्षाची बांधणी केली आहे. मात्र, त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेतल्याने शिवसेना पदाधिकारी नाराज असून ते उघडपणे पाटील यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. 

अल्पसंख्याक समाजात नाराजी
काँग्रेसकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरूच असल्याने टावरे समर्थक व काँग्रेसमधील अल्पसंख्याक समाज बांधव नाराज झाले असून पक्षाने आयात उमेदवार दिल्यास पक्षाविरोधात काम करण्याचा इशारा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत देण्यात आला आहे. २०१४ च्या निवडणुकीत टावरे हे सक्षम उमेदवार असताना पक्षश्रेष्ठींनी कुणबी सेनाप्रमुख विश्‍वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे टावरे समर्थक व मुस्लिम समाजासह आगरी समाज बांधवांतही तीव्र नाराजी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com