मागोवाः माने, आवाडे गटाची झाली शक्तिपरीक्षा

मागोवाः माने, आवाडे गटाची झाली शक्तिपरीक्षा

इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला विरोधी पक्षाच्या उमेदवारापेक्षा स्वपक्षातील गटबाजीचीच अधिक भीती. अर्थात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, या म्हणीप्रमाणे इथला उमेदवारही सारे राजकारण बऱ्यापैकी कोळून प्यायलेलाच निवडला गेला. १९९६ मध्ये असेच झाले. बाळासाहेब माने यांच्या सलग पाच वर्षांच्या खासदारकीनंतर पुढचा काँग्रेसचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली. बाळासाहेब माने यांनी त्यांची स्नुषा निवेदिता माने यांचा आग्रह धरला; पण काँग्रेसने सहकारातला ज्येष्ठ नेता म्हणून कल्लाप्पा आवाडे यांच्या नावाला पसंती दिली.

कल्लाप्पा आवाडे यांच्‍या उमेदवारीची घोषणा होताच निवेदिता माने यांनी बंडाचा पवित्रा घेतला व आवाडे यांच्या उमेदवारीत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेस पक्ष असा आहे, की तेथे एखाद्या कार्यकर्त्याचे लाडही केले जातात आणि फार ताठर भूमिका घेणाऱ्याला फटकारलेही जाते. तसेच येथे झाले. निवेदिता माने यांच्या ऐवजी आवाडे यांचे नाव नक्की झाले. भारतीय जनता पक्षाने गणपतराव सरनोबत यांना उमेदवारी दिली. आसुर्ले येथील दत्त साखर कारखान्याच्या निमित्ताने सरनोबत परिचित होते.

इचलकरंजीच्या परंपरेप्रमाणे या निवडणुकीत काँग्रेसमधल्या गटबाजीचे दर्शन घडले. बाळासाहेब माने गट आवाडे यांच्या विरोधात उभा राहिला आणि निवडणुकीतील चुरस वाढली. निवेदिता माने यांचा आक्रमक प्रचार परिणामकारक ठरला. निवडणुकीचा निकाल लागला. त्यात आवाडे निवडून आले; पण इचलकरंजी, शिरोळ, वडगाव या आवाडेंच्या कार्यक्षेत्रात त्यांना मते कमी मिळाली; मात्र पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, 
भुदरगड या पट्ट्यांत आवाडेंना मतदारांनी उचलून धरले व त्याच मतांवर आवाडे विजयी झाले. भाजपच्या गणपतराव सरनोबत यांना १ लाख २५ हजार मते मिळाली.

खासदार म्हणून कल्लाप्पा आवाडे यांनी दिल्लीमध्ये आपला आदरयुक्त दबदबा राखला. ज्यांनी मते दिली नाहीत, त्यांचा वचपा काढायचा असला प्रकार त्यांच्याकडून घडला नाही; पण माने गटाचा विरोध खासदारकीनंतर पुन्हा वाढतच गेला; पण माने यांची राजकीय महत्त्वाकांक्षा छोट्या छोट्या समारंभांतूनही व्यक्त होत राहिली. पुढच्या निवडणुकीत तर त्या शिवसेनेत गेल्या. शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या; पण पुन्हा आवाडे दादा निवडून आले; मात्र आपल्याच घरात राजकारणातील, सहकारातील सर्व पदे या टीकेचे धनी ठरले. त्यांनी खासदारकीचा सन्मान राखला. पन्हाळा, बावडा, राधानगरी, भुदरगडवर विशेष लक्ष देऊन तेथील वाड्यावस्तीवरची कामे केली; पण इचलकरंजीत सरळ कोणच कोणाला काम करू न देण्याची एक राजकीय परंपरा आहे. आवाडेंना त्याचा पुढे फटका बसत गेला व इचलकरंजीच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलत गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com