Loksabha Election 2019 : निवडणूका आणि आपण...

Loksabha Election 2019 : निवडणूका आणि आपण...

देशात लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरवात करतील. खालच्या पातळीवर जाऊन टीका होतील. शिव्या शापही दिले जातील. एकमेकांच्या जातीही काढल्या जातील. आपण मात्र, मोक्कार टाळ्या वाजवत बेंबीच्या देठापासून "... विजय असो' अशा घोषणा देणार. पण, सर्व पक्षाकडून शेती, बेरोजगारी, विकास या मुद्यांना सोईस्कर बगल दिली जाईल. प्रश्न उरतो तो हा की हे असं किती दिवस आणि किती निवडणुका चालू द्यायचं? 

आपण मतदार म्हणून किती सक्षम आहोत. मतदार म्हणून कामे करून घेण्यास आपण यशस्वी होतो का? उत्तर नाही असेल तर त्याचा विचार कधी करणार??? 
'लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविल्या जाणाऱ्या लोकशाहीला' देशातील काही ठरावीक लोकांनी आपल्या दावणीला बांधलं आहे. चार-चार पाच-पाच पिढ्या एकाच घरातील लोक लोकप्रतिनिधी राहतात. हे मुळात लोकशाहीलाच घातक आहे. ही जमात लोकशाहीमध्ये राजेशाहीचा पद्धत निर्माण करीत असते. आणि काही अंशी त्यामध्ये ते यशस्वी देखील झालेले आपण पाहत आहोत. निवडणुकीत नको तितकी आश्वासने ही लोक नागरिकांना देत फिरतात. पाच वर्षातून एकदा गावात येतात. मतदानाअगोदर लोकांचे पाय धरतात. मात्र, निवडणुकीनंतर या लोकप्रतिनिधींचे पाय कधी दिसत नाहीत. असो.

यावर्षी महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आहे. माझ्या पाहण्यातील दुष्काळापैकी सर्वांत दाहकता असणारा हा दुष्काळ आहे. शेकडो गावात लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा नाही. शेतकऱ्यांच्या घरात धान्य नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची अशी भयाण परिस्थिती असूनही सरकारला, ना विरोधकांना, ना माध्यमांना त्याचं गांभीर्य, त्याची दाहकता लक्षात येत नाही. किंबहुना ती लक्षात घेण्याची त्यांची इच्छा नसते. कारण, रखरखत्या उन्हात पायपीट करत या भागात जाण्याची, फिरण्याची इच्छा या तिघांचीही नाही. ही परिस्थिती सरकारच्या गळ्यापर्यंत आल्याने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्याही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या जातात. बऱ्याच चारा छावण्यात मोठ्या प्रमाणात भष्टाचार होत असला तरी,  'तेरी भी चूप, मेरी भी चूप' म्हणतं जनावरांच्या चाऱ्याचा निधी लाटला जातो. ऐवढं करूनही तो कार्यकर्ता स्वतःहा शेतकऱ्यांचा तारणहार समजत गावामध्ये मीरवत असतो. हा प्रकार जेवढा भयंकर आहे. तेवढाच तो घातक आहे. 

गांधीजींच्या 'गावाकडं चला' या संकल्पनेला हरताळ फासत देशातील नेत्यांनी गावाचा गाडा पूर्णपणे विस्कळित केलाय. आता या गावातील लोकांचे तांडे शहराच्या दिशेने येण्यास सुरवात झाली आहे. एक अहवालानुसार पुढील 50 वर्षात अर्ध्याच्यावर मराठवाड्याचं रूपांतर वाळवंटात झालेलं असेल. आणि शेकडो गावे ओस पडलेली असतील. याकडे सर्वच नेतेमंडळी सोईस्कर डोळे झाक करताना दिसतात. गंमत म्हणजे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापैकी सर्वाधिक मुख्यमंत्री हे मराठवाड्याचे झालेले आहेत. याच मराठवाड्यातील बहुतांश गावातील जनावरे जगविण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या आहेत. पण, हे असं प्रत्येक वर्षी चालू राहणार का? 
आपण जाती-धर्माच्या नावावर किती वर्षे मत देणार ? मंदिर-मस्जिद यापेक्षा रुग्णालये, शाळा यांना कधी महत्त्व देणार? धार्मिक दंगलीत किती वर्षे रक्त सांडविणार? आपली विवेक बुद्धी खरंच बंद पडलीय का? आपण या गोष्टींचा विचार करू शकत नाहीत का? विचार करा.. स्वतःलाच प्रश्‍न विचारा... उत्तरेही स्वतःच शोधा... धन्यवाद! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com