Loksabha 2019 : आघाडीत जागांच्या फेरबदलाचा तिढा सुटेना

Loksabha 2019 : आघाडीत जागांच्या फेरबदलाचा तिढा सुटेना

मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत जागावाटपाचा पेच मिटलेला असला, तरी मतदारसंघ अदलाबदलीचा तिढा मात्र कायम आहे. कॉंग्रेसकडील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला हवा आहे, तर कॉंग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्यासाठी उस्मानाबाद लोकसभेची मागणी केल्याची माहिती आहे. रावेर व उस्मानाबाद आपल्याला द्यावेत, असे कॉंग्रेसचे मत आहे. मात्र, उस्मानाबादवर चर्चाच होऊ शकत नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 

आघाडीच्या चर्चेत मतदारसंघात निवडून येण्याची खात्री असलेला सक्षम उमेदवार देण्यावर दोन्ही पक्षांतील नेत्यांचे एकमत आहे. याशिवाय, ज्या मतदारसंघात सलग तीनवेळा पराभव झाला; त्यातील काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याची चर्चा आघाडीच्या बैठकात झाली होती. मात्र, नगरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसला सोडली नसल्याने सलग तीनवेळा पराभूत झालेल्या मतदारसंघांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोडित काढल्याची कॉंग्रेस नेत्यांची भावना आहे. नगरमध्ये कॉंग्रेसकडे सुजय विखे पाटील यांच्या रूपाने सक्षम उमेदवार होता. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा सोडली नाही. 

आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला औरंगाबादची जागा हवी आहे. या जागेसाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे; तर रावेरमध्ये डॉ. उल्हास पाटील हे कॉंग्रेसचे सक्षम उमेदवार असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा सोडावी, असा कॉंग्रेसचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येते. 

लातूर लोकसभा राखीव झाल्यानंतर शिवराज पाटील चाकुरकर यांना संधी मिळाली नाही. त्यांना राज्यसभेवर संधी देत केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. मात्र, सध्या लातूर व सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाजाचा राजकारणावर वाढता प्रभाव पाहता या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी कॉंग्रेसमधून दबावतंत्र सुरू आहे.

उस्मानाबादच्या बदल्यात औरंगाबाद

उस्मानाबाद लोकसभेत लिंगायत मतदारांची संख्या दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे शिवराज पाटील चाकुरकर यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची मागणी जोर धरत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे या लोकसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्या पद्‌मसिंह पाटील यांच्या सून आहेत.

त्यांना उमेदवारी मिळाल्यास विजयाची खात्री कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे पती व माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनाच उमेदवारी देण्याचा विचार "राष्ट्रवादी'त सुरू आहे. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नसला, तरी उस्मानाबादच्या बदल्यात औरंगाबाद, असा नवा सूर कॉंग्रेस नेत्यांमध्ये सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com