भवानीनगर - पहिल्या कॅबिनेटलाच आरक्षण देऊ असे आम्ही म्हणालो असेल; परंतु आततायीपणे आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. फक्त हेच मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकतात, इतर कोणी देऊच शकणार नाही, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भिगवण (ता. इंदापूर) येथे सांगितले.
राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासंदर्भात विचारले असता जानकर म्हणाले, 'मराठा, धनगर आरक्षणात युवकांनी संयम ठेवावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तावून सुलाखून लिहिली आहे. आरक्षण देताना घटनेचा आधार घेऊनच बार्टीचा, वेगवेगळ्या संस्थांचा अहवाल, ऐतिहासिक परंपरा याचा विचार केला जातो. त्याचा अहवाल आल्यानंतर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल.''
मुख्यमंत्री आरक्षणाच्या विषयाबाबत प्रामाणिक व ठाम आहेत. आम्ही तर आज साडेतीन वर्षेच झाली सत्तेवर आलो आहोत. आरक्षण का मिळाले नाही, हा प्रश्न गेली कित्येक वर्षे राज्य करणाऱ्यांनादेखील विचारायला हवा. अण्णासाहेब पाटील महामंडळातून सध्या 750 कोटींचे कर्ज दिलेले आहे. ओबीसीप्रमाणेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणात सवलत दिलेली आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आजवरचे धनगर समाजाच्या आरक्षणाचे अहवाल नकारात्मक होते, शिवाय अनुसूचित जातीत समावेश करण्याचे अधिकार राज्य सरकारला नव्हते, त्याचाही विचार करायला हवा, असे जानकर म्हणाले.
|