औरंगाबाद : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची शक्यता फेटाळून लावतानाच या निवडणुकांत मतदान कुणाला केले हे मतदाराला लगेच दिसेल, अशी महत्त्वाची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी आज येथे दिली.
औरंगाबाद येथे संपादकांशी गुरुवारी (ता.23) औपचारिक चर्चा करताना रावत म्हणाले, "इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीत मतदान कुणाला गेले हे कळावे, यासाठी साडेसतरा लाख व्हीव्हीपॅट यंत्रांची गरज आहे. सध्या निवडणूक आयोगाकडे दहा लाख व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत. लवकरच उर्वरित साडेसात लाख व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध होतील. त्यामुळे मतदान केल्यानंतर आपले मतदान बरोबर झाले असल्याची खात्री मतदाराला तात्काळ होईल. केलेले मतदान काही क्षण आपल्याला व्हीव्हीपॅट यंत्रामुळे दिसेल.''
एकत्रित निवडणुकांबाबत रावत यांनी सांगितले, "लोकसभा आणि अकरा राज्यांतील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी घटनेत बदल करावा लागेल. त्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. कायदेमंडळाने ही घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली तरी वर्ष 2019 च्या निवडणुका एकत्रित घेणे अशक्य आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासाठी केंद्रीय कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी आणि निमलष्करी दलांचा वापर करावा लागतो. त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग पार पाडते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.