जीवरक्षक गोविंदलाच करावा लागतोय 'या'साठी संघर्ष

govind tupe.jpg
govind tupe.jpg

नाशिक : पाण्यात बुडणाऱ्या जीवाला वाचवण्यासाठी धरणासह खोल नदीपात्राच्या वेगवान जलप्रवाहात उडी मारून जीवदान देणारे राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार प्राप्त बेलू येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांच्या नशिबी जीवरक्षक म्हणून मिळणाऱ्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आले आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही पाण्यात बुडालेल्या लोकांचे प्राण वाचविण्याचे त्यांचे निस्वार्थी कार्य जोमाने सुरूच आहे. त्यांना जीवरक्षक म्हणून शासनस्तरावर कुठल्याही प्रकारचे  मानधन मिळत नाही. शासनाने दखल घेऊन मानधन  सुरू करावे अशी मागणी तालुक्यातुन होत आहे 
       

जीवरक्षक तुपेंना मानधनासाठी करावा लागतोय संघर्ष

सध्या तुपे यांना त्यांच्या कामासाठी पाणबुडी मिळाली आहे. मात्र तिच्यात ऑक्सिजन टाकण्यासाठी पैसेच नसल्याने बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.यासाठी कॉम्प्रेसर मशीन सुविधा मिळण्यासाठी तुपे यांनी आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने येत्या (ता.२५) तारखेला जीवरक्षकांच्या विविध अडचणीबाबत राष्ट्रपती महोदयांची तुपे भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले . 
         

देवदुतासारखे धावून जाणा-या तुपेंचे अनेक वर्षांपासून जोखमीचे कार्य  

अपघात झालेल्यांच्या मदतीला देवदुतासारखे धावून जाणारे तुपे हे गेल्या अनेक वर्षांपासून जोखमीचे कार्य करीत असून आतापर्यंत त्यांनी १ हजार ७३५  मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. ६० बुडणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.तर किमान ८० व्यक्तींचे अपघातात प्राण वाचविले आहेत. विहीर,धरण,नदीपात्रातून काढलेल्या मृतदेहाच्या अंगावरील सोन्याची दागिने परत देण्याचे प्रामाणिक काम तुपे हे करतात. सगळीकडे कुणीही कुणाला विनामूल्य मदत करीत नसल्याचे चित्र दिसते. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने ही व्यक्ती बुडणाऱ्यांसाठी आधार ठरत आहे. तसेच पोलिसांना देखील ही व्यक्ती मोठी मदत ठरते आहे. माणसातील देवमाणूस असलेल्या या जीवरक्षकाचे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी कौतुक केले. ३५ वर्षांपासून निष्काम सेवा करणाऱ्या तुपे यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी प्रांत अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह सर्व पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत यांनी शिफारस पत्र देऊन अभिमानाने गौरव  केला.    
   

मदतीला धावून जाणे हे गोविंद तुपे यांचे आद्य कर्तव्यच
बुडणाऱ्या जीवाच्या कुठलाही विचार न करता मदतीला धावून जाणे हे गोविंद तुपे यांचे आद्य कर्तव्यच बनले आहे. रात्री अपरात्री केव्हाही कुठेही घटना घडली तर त्या क्षणी मदत करायला सिन्नर तालुक्यातील बेलु येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील जीवरक्षक गोविंद तुपे हे नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या रुपाने सदैव माणुसकीचे दर्शन घडत असते.एका जीवाला दिलेले जीवदान त्या व्यक्तीच्या किमान ४ व्यक्तींना नवे आयुष्य देत असते. जीवरक्षक गोविंद तुपे यांनी बुडतांना वाचवलेल्या शेकडो व्यक्तीच्या नव्या आयुष्याबद्दल त्यांना राष्ट्रपती जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. हे विशेष असले तरी समाजपयोगी कार्याने जिल्ह्यात वेगळाच ठसा निर्माण करणारे जीवरक्षक तुपे मात्र शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. 
या सामाजिक कामात माझ्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकलो नाही. शासनाने माझ्या मुलांना कुठेतरी चांगल्या कामावर रुजू  करावे अशी मागणी वजा अपेक्षा तुपे यांनी व्यक्त केली आहे 

प्रतिक्रिया 
 गोविंद तुपे हे बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेतात. या कामात समाजाकडून कोणतीही अपेक्षा करीत नाही. त्यांच्या माध्यमातून निस्वार्थपणे समाजसेवेचे अखंड कार्य घडत आहे. जिल्ह्यात आपात्कालीन कामासाठी आम्हाला त्यांची खूप मोठी मदत होते. मोठ्या धाडसाने ही व्यक्ती पाण्यात सूर मारून अनेकांना वाचवून जीवनदान देण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहे. 
- सुहास देशमुख, (पोलीस निरीक्षक,वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com