विकास करणाऱ्यालाच मतदार निवडतात : पंतप्रधान

File photo
File photo

साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत आरोग्यसेवा मिळत आहे. हे सगळे सरकारने केलेल्या कामाचे परिणाम आहेत. या जनकल्याणातूनच आपल्याला राष्ट्रनिर्माण करावयाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी साकोली-सेंदूरवाफा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम जिल्ह्यातील वैनगंगा व चुलबंद नद्यांना नमन केले व झाडीपट्टीतील धान उत्पादकांसोबत मराठीतून संवाद साधला. यावर्षी धानाचे पीक चांगले आहे काय? राज्य सरकारने धानाला बोनस दिला की नाही? असे प्रश्‍न त्यांनी उपस्थितांना विचारले. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत गोंदिया येथे तुम्हाला आशीर्वाद मागितला होता. तो तुम्ही इतका दिला की, राजकीय विश्‍लेषकांचे अंदाज, आडाखे खोटे ठरलेत. त्याबद्दल पंतप्रधानांनी मतदारांचे आभार मानले.
आमच्या सरकारने कोणत्याही जाती समुदायाच्या नावाने योजना राबविल्या नाहीत. मात्र दलित, शोषित, आदिवासी, गरीब अशा समाजातील सर्वच घटकांना योजनांचा फायदा मिळवून दिला आहे. या देशातील आपण सर्व एका कुटुंबाप्रमाणे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, संत संताजी महाराज या महापुरुषांना हेच अभिप्रेत होते, असे श्री. मोदी म्हणाले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करून अनेक कामे केली आहेत. तेव्हा 2014 प्रमाणेच यावेळीही राज्यात भाजप युतीचे सरकार येईल, असा विश्‍वास व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा फायदा आता भंडारा, नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापूर्वी सिंचन, पाणीपुरवठा, बंधारे, प्रकल्प वेगवेगळ्या विभागात होते. परंतु, या सरकारने हे सर्व विभाग जलशक्ती मंत्रालयाशी जोडले आहेत.
येत्या पाच वर्षांत साडेतीन लाख रुपये खर्चातून जलसंसाधनांचा विकास करण्यात येणार आहे. शुद्ध पाण्याचा ग्रामीण भागात पुरवठा होईल. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 25 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या सर्व विकासकामांमुळे शेतकरी वर्गात आत्मविश्‍वास निर्माण होईल. रोजगार निर्मिती होईल. मजूर, आदिवासी, लहान व्यापारी या वर्गातील वृद्धांना 60 वर्षांनंतर पेन्शन देण्यात येईल, सामान्य नागरिकांना आरोग्य, शिक्षण व चांगले रस्ते या सेवा मिळाव्यात यासाठी सरकार अधिक प्रयत्न करणार असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राज्याचे ऊर्जामंत्री व पक्षाचे पूर्व विदर्भ प्रचारप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले, खासदार सुनील मेंढे, डॉ. हेमकृष्ण कापगते, तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार उपस्थित होते.

पर्यटनातून रोजगार
भंडारा जिल्ह्यातील नागझिरा-नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पात देशभरातील पर्यटक येतात. त्यातून येथील आदिवासी व गरीब युवकांना रोजगार निर्माण व्हावा. याकरिता व्यवसाय करण्यास सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे ग्रामीण व जंगलव्याप्त भागात रोजगार संधी निर्माण होतील, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com